19 आदिवासी गावांत नागरिकांचे उत्पन्न 50 टक्क्यांनी वाढविणार

मुख्यमंत्र्यांच्या पुढाकाराने प्रकल्प

xr:d:DAFjz3_gicg:3,j:47812504280,t:23052407

गडचिरोली : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने व मार्गदर्शनाखाली गडचिरोली जिल्ह्यातील शेतकरी कुटुंबांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून त्यांच्या उत्पन्नात 50 टक्क्यांनी वाढ करण्यासाठी एक महत्त्वाकांक्षी उपक्रम सुरू झाला आहे. एसबीआय फाऊंडेशन आणि पुणे येथील जागतिक स्तरावर मान्यताप्राप्त संस्था ‘वॉटर’ (WOTR-Watershed Organisation Trust) यांनी भागीदारी करत धानोरा तालुक्यातील 19 आदिवासीबहुल गावांसाठी उपजीविका विकास कार्यक्रम हाती घेतला आहे. यामुळे या भागातील ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळ मिळणार आहे.

प्रकल्पाची व्याप्ती व आर्थिक सहाय्य

एसबीआय फाऊंडेशनच्या प्रमुख ‘लीप’ उपक्रमांतर्गत हा प्रकल्प ऑगस्ट 2025 ते जुलै 2028 या तीन वर्षांसाठी धानोरा उपविभागातील 19 गावांत राबविण्यात येणार आहे. फाऊंडेशनने या उपक्रमासाठी 4 कोटी 98 लाख 65 हजार रुपये अनुदान दिले आहे, ज्यामुळे या भागातील कुटुंबांना मोठा आधार मिळणार आहे.

50 टक्के उत्पन्नवाढीचे उद्दिष्ट्य

या प्रकल्पाचे मुख्य आणि महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट धानोरा तालुक्यातील 19 ग्रामीण गावांमधील 1294 कुटुंबांची उपजीविका सुधारणे हे आहे. उत्पन्नाचे स्रोत केवळ शेतीपुरते मर्यादित न ठेवता त्यांचे विविधीकरण करून, या कुटुंबांचे वार्षिक घरगुती उत्पन्न 50 टक्क्यांनी वाढवणे हे प्रकल्पाचे लक्ष्य आहे. हे महत्त्वाचे उद्दिष्ट साधण्यासाठी जलसंपदा विकास, टिकाऊ शेती आणि पशुधन व्यवस्थापन या तीन मुख्य स्तंभांवर लक्ष केंद्रित केले जाणार आहे.

प्रकल्पात या 19 गावांचा समावेश

धानोरा तालुक्यातील बोदिरी, कामनगड, मोरचुल, कान्हेली, हलकानहर, मरकेगाव, मिचगाव (झाडा), पेकिन मुडझा, पायडी, सोमालपूर, बोतेहूर, झाडपापडा, रूपिनगट्टा, मसनडी, दुर्गापूर, पळसगाव, खारगी, धोरगट्टा आणि रेचे या गावांचा समावेश या प्रकल्पात असून प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी या गावातील महत्वाच्या व्यक्तींसोबत वैयक्तिक व सामुहिक चर्चादेखील झाली आहे.

सहभागी संस्थांचा अनुभव

या प्रकल्पातील भागीदार संस्था त्यांच्या संबंधित क्षेत्रांमध्ये महत्त्वपूर्ण कार्य करतात. एसबीआय फाऊंडेशनचा ‘लीप’ उपक्रम देशभरातील वंचित समुदायांना दारिद्रयाच्या चक्रातून बाहेर काढण्यासाठी सुक्ष्म-उद्योजकता आणि एकात्मिक उपजीविका मॉडेल विकसित करण्यावर भर देतो. दुसरीकडे, वॉटर (WOTR) ही संस्था 1993 मध्ये स्थापन झाली असून, ती प्रामुख्याने पाणलोट क्षेत्र विकास, हवामान बदलाशी जुळवून घेणारी शाश्वत शेती आणि नैसर्गिक संसाधनांचे व्यवस्थापन या क्षेत्रांतील तिच्या प्रदीर्घ अनुभवासाठी ओळखली जाते. एसबीआय फाऊंडेशनचे आर्थिक पाठबळ आणि वॉटरचे ग्रामीण उपजीविका व जलव्यवस्थापनाचे तज्ज्ञ ज्ञान एकत्र आल्याने येथील शेतकऱ्यांच्या आर्थिक व पर्यावरणीय परिस्थितीत लक्षणीय सुधारणा होण्याची अपेक्षा आहे.