Home दैनंदिन बातम्या हत्तीच्या हल्ल्यातील मृत शेतकऱ्याच्या कुटुंबियांची मा.खा.नेतेंनी घेतली भेट

हत्तीच्या हल्ल्यातील मृत शेतकऱ्याच्या कुटुंबियांची मा.खा.नेतेंनी घेतली भेट

सांत्वन करत दिली आर्थिक मदत

मडावी यांच्या कुटुंबियांना वैयक्तिकरित्या आर्थिक मदत देऊन धीर देताना मा.खा.डॅा. अशोक नेते

गडचिरोली : शहराजवळील बोदली मेंढा येथील धनराज मनिराम मडावी (35 वर्ष) या शेतकऱ्याचा हत्तीच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याने त्याच्या कुटुंबियांवर मोठे संकट आले आहे. अशा स्थितीत माजी खासदार तथा भाजप अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॅा.अशोक नेते यांनी मडावी यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. तसेच वैयक्तिक स्वरूपात त्यांना आर्थिक मदत दिली. शासकीय मदतीसाठी मुख्य वनसंरक्षकांशी बोलून लवकरात लवकर ही मदत देण्याची सूचना केली. (अधिक बातमी खाली वाचा)

शेतीसाठी खत आणायला गेले अन्…

मिळालेल्या माहितीनुसार, 8 जुलै रोजी सायंकाळच्या सुमारास धनराज हे शेतीसाठी खत आणण्याकरिता गेले होते. दरम्यान, गावाजवळच्या परिसरात आलेल्या नर हत्तीला पाहण्यासाठी लोक जमलेले होते. धनराज मडावी हेसुद्धा तिथे इतर नागरिकांसोबत हत्तीला पाहात असताना अचानक हत्तीने झुडूपातून बाहेर येऊन पाठलाग केला. त्यात मडावी हे हत्तीच्या तावडीत सापडले. हत्तीने सोंडेने त्यांना उचलून चिरडले.

या घटनेने ओढवलेल्या संकटात मडावी कुटुंबियांना धीर देण्यासाठी माजी खासदार डॉ.अशोक नेते यांनी बोदली मेंढा गावाला भेट दिली. मडावी कुटुंबावर कोसळलेला हा आघात अत्यंत मोठा आहे. आम्ही या कठीण काळात पूर्णपणे त्यांच्या पाठीशी उभे आहोत, असे मा.खा.नेते म्हणाले.

यानंतर डॉ.अशोक नेते यांनी थेट शेताच्या बांधावर जाऊन हत्तीच्या कळपाने केलेल्या नुकसानीची पाहणी केली. हत्तींनी धान पिकांचे अतोनात नुकसान केले आहे. येथील व्यापारी दिलीप बुरले यांच्या धान्याच्या गोदामाचे शटर तोडून आत ठेवलेल्या धान्याची आणि गोदामाची मोठी नासधूस हत्तींनी केली आहे.

मुख्य वनसंरक्षकांशी दूरध्वनीवरून चर्चा

परिस्थितीचे गांभीर्य ओळखून डॉ.नेते यांनी घटनास्थळावरूनच गडचिरोलीचे मुख्य वनसंरक्षक (CCF) गजेंद्र नरवणे यांच्याशी मोबाईलवरून संपर्क साधला. मडावी कुटुंबाला तात्काळ सानुग्रह मदत देण्याची आणि हत्तींनी केलेल्या शेतपिकांच्या व गोदामाच्या नुकसानीचे त्वरित पंचनामे करून नुकसानभरपाई देण्याची सूचना त्यांनी वनविभागाला दिली.

गावकऱ्यांना सतर्कतेचा इशारा आणि महत्त्वाच्या सूचना

हत्तींचा वावर पाहता डॉ.अशोक नेते यांनी गावकऱ्यांशी संवाद साधत काळजी घेण्याचे आवाहन केले. जंगलात किंवा शेतात काम करताना नागरिकांनी एकटे जाणे टाळावे, हत्तींचा कळप आसपास असताना नेहमी 4-5 लोकांनी मिळूनच बाहेर पडावे. हत्तीचा कोणताही सुगावा लागल्यास त्यांच्या जवळ न जाता तात्काळ इतर गावकऱ्यांना आणि वनविभागाला माहिती देऊन सतर्क करावे.

या सांत्वनपर भेटीदरम्यान प्रामुख्याने भाजप किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष विलास भांडेकर, कामगार आघाडीचे जिल्हाध्यक्ष सुधाकर पेटकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक तथा धान्य व्यापारी दिलीप बुरले, भाजपचे माजी तालुकाध्यक्ष रामरतन गोहणे, पो.पा. प्रमोद साखरे, तंटामुक्त समितीचे माजी अध्यक्ष रविंद्र बुरले, दिवाकर पिपरे, प्रकाश निकुरे (धान्य व्यापारी) संभाजी ठाकरे, राकेश राचमलवार आणि मोठ्या संख्येने ग्रामस्थ व नागरिक जनता उपस्थित होते.