कंटेनरमधून कत्तलीसाठी जाणाऱ्या 38 जनावरांना दिले जीवनदान

कोरची पोलिसांची धडक कारवाई

कोरची : कंटेनरमध्ये दुहेरी कप्पे करून 38 जनावरांना कत्तलखान्याकडे घेऊन जाणाऱ्यांना कोरची पोलिसांनी रोखून त्या जनावरांना जीवनदान दिले. याप्रकरणी एकाला अटक केली तर दुसरा पळून जाण्यात यशस्वी झाला. नागपूरच्या कंटेनर मालकावरही गुन्हा दाखल करण्यात आला.

ही कारवाई कोरची ठाण्याचे एपीआय मुकूंद देशमुख व त्यांच्या पथकाने बुधवारी पहाटे 5.40 वाजता बोटेकसा मार्गावर करण्यात आली. एका कंटेनरमधून कत्तलीसाठी जनावरे नेली जात असल्याची माहिती कोरची पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार बोटेकसा ते कोरची मार्गावर पोलिसांनी पाळत ठेवून कंटेनर क्रमांक एमएच 04, एमएच 3685 पकडला. यावेळी अल्ताफ अनवर शेख (27 वर्ष) रा.गडचांदूर (जि.चंद्रपूर) याला अटक करण्यात आली. याशिवाय त्याचा सहकारी राजु कुरेशी रा.नागपूर आणि पळून गेलेला चालक साबीरअली दाऊदअली रा.यशोधरानगर, नागपूर यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

जीवदान दिलेल्या जनावरांची अंदाजे किंमत 1 लाख 90 हजार आणि कंटेनरची किंमत 30 लाख, असा एकूण 31 लाख 90 हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक योगेश पवार करीत आहे.