दाम्पत्याच्या दुचाकीला ट्रकची धडक, महिला ठार, पुरूष गंभीर जखमी

4 मुलींवर कोसळला दु:खाचा डोंगर

अहेरी : अहेरीच्या आठवडी बाजारात येण्यासाठी निघालेल्या राजपूर पॅच येथील येलेलावार दाम्पत्याच्या दुचाकीला एका भरधाव ट्रकने धडक दिल्याने पत्नी ठार तर पती गंभीर जखमी झाला. हा अपघात दिना नदीजवळ घडला. विशेष म्हणजे या दाम्पत्याला चार मुलीच असल्याने त्यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

संजय बाला येलेलावार असे जखमीचे तर कमला संजय येलेलावार (37 वर्षे) असे ठार झालेल्या महिलेचे नाव आहे. अहेरीच्या बाजारात शनिवारी मासे विक्रीसाठी बोरी येथून दुचाकीने येत असताना मागून आलेल्या एका ट्रकने त्यांना दिना नदीजवळ जबर धडक दिली. यात कमला येलेलावार यांचा जागीच मूत्यू झाला, तर पती संजय येलेलावार गंभीर जखमी झाले. अचानक ओढवलेल्या या प्रसंगाने येलेलावार दाम्पत्याच्या मुली कल्याणी, मौणिक, रेखा व श्रुती आईला पोरक्या झाल्या आहेत.

गरीब कुटुंबातील येलेलावार दाम्पत्य आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी शेती, मोलमजुरी करतात. कमला येलेलावार आठवडी बाजारात मासे विक्री करत होत्या.

या घटनेनंतर काँग्रेसचे अहेरी विधानसभा समन्वयक तथा माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. संबंधितावर कारवाई होणार नाही तोपर्यंत मृतदेह उचलणार नाही अशी भूमिका त्यांच्या नेतृत्वात नातेवाईकांनी घेतली. एसडीपीओ अजय कोकाटे व पोलीस निरीक्षक स्वप्नील इज्जपवार यांनी ट्रक चालक सुभाष नंदन गुप्ता (रा.वाराणसी, उत्तर प्रदेश) याला अटक केली. या कारवाईनंतर मृतदेह उचलण्यात आला.

यावेळी अहेरीचे नगरसेवक प्रशांत गोडसेलवार, महागाव ग्रामपंचायतचे सदस्य राजू दुर्गे, अवि सडमेक, व्यंकटेश बिलासपल्लीवार, महेश बाकेवार यांच्यासह स्थानिक नागरिक व कार्यकर्ते उपस्थित होते.