गडचिरोली : यावर्षीच्या राज्य शिक्षण मंडळाच्या बारावीच्या परीक्षेत जिल्ह्याचा निकाल घसरला आहे. जिल्ह्यात सरासरी 81.77 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्यात सर्वाधिक 90.71 टक्के निकाल देऊन एटापल्ली तालुक्याने बाजी मारली, तर सर्वात कमी 66.76 टक्के निकाल मुलचेरा तालुक्याचा लागला आहे.
देसाईगंजच्या महात्मा गांधी कनिष्ठ विज्ञान महाविद्यालयाची शरयू विलास ढोरे हिने 92 टक्के गुण घेऊन जिल्ह्यात सर्वाधिक गुण घेण्याचा बहुमान पटकावला आहे. यासोबत मुलचेरा तालुक्यातील सुंदरनगरच्या नेताजी सुभाषचंद्र बोस विद्यालयाचा स्नेहांशू संजीव सरकार याने 91.17 टक्के, तर गडचिरोलीच्या शिवकृपा कनिष्ठ विज्ञान महाविद्यालयाची संजना कालिदास पदा हिने 90.67 टक्के गुण घेऊन जिल्ह्यात तृतीय स्थान पटकावले.
जिल्ह्यात एकूण 12 हजार 814 विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली होती. त्यात 5439 मुली आणि 5040 मुले उत्तीर्ण झाले आहेत. मुलांच्या तुलनेत मुलींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण जास्त आहे.
तालुकानिहाय निकालाचे प्रमाण
गडचिरोली- 83.06 टक्के, अहेरी- 81.15 टक्के, आरमोरी- 74.64 टक्के, भामरागड- 80.64 टक्के, चामोर्शी- 86.31 टक्के, देसाईगंज- 85.23 टक्के, धानोरा- 78.90 टक्के, एटापल्ली- 90.71 टक्के, कोरची- 89.26 टक्के, कुरखेडा-77.86 टक्के, मुलचेरा- 66.76 टक्के, सिरोंचा- 86.99 टक्के