देसाईगंज : शैक्षणिक क्षेत्रातील बदल पाहून मातांनी आपल्या मुलांच्या मानसिकतेत जाणीवपूर्वक बदल घडवून आणला पाहिजे. त्यांना समाजातील आदर्श व्यक्ती बनवण्यात आणि त्यांचे व्यक्तिमत्व उंचावण्यात मातांची भूमिका महत्त्वाची असते, असे प्रतिपादन रेश्मा वकील शेख यांनी केले. स्थानिक रफी अहमद किडवाई प्राथमिक सेमी इंग्लिश स्कूलमध्ये आयोजित माता-पालक संमेलन व शाळा व्यवस्थापन समितीच्या बैठकीत अध्यक्षस्थानावरून त्या बोलत होत्या.
मुख्याध्यापक मो.आरिफ शेख यांच्या मार्गदर्शनात घेण्यात आलेल्या बैठकीत मंचावर आशिक बेग, आसिफ कुरेशी, शकील अहमद शेख, शाहिद बेग, रफी आलम, एजाज कुरेशी, रोशन शेख प्रामुख्याने उपस्थित होते.
नाण्याला दोन बाजू असतात, त्याचप्रमाणे गुरु आणि शिष्य शाळेचे दोन पवित्र पैलू आहेत. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासाची जबाबदारी पालकांचीही असते. पण विद्यार्थ्यांचे पालक याकडे दुर्लक्ष करतात. यश मिळविण्यासाठी अभ्यासाकडे गांभीर्याने लक्ष द्यावे लागते, असे यावेळी रेश्मा वकील शेख म्हणाल्या.
यावेळी इयत्ता पहिली ते चौथीच्या शिक्षकांनी पालकांशी चर्चा करून आपल्या वर्गातील मुलांच्या शिक्षणाबाबत सविस्तर माहिती दिली. या बैठकीसाठी शिक्षिका फरहत शमीम, सलमान अहमद, रजिया खान व शिक्षकेत्तर कर्मचारी शहनाज बेगम, नसरीन सुलताना यांनी परिश्रम केले. संचालन अमजद खान तर आभार अलमास खान यांनी मानले.