नागपुरातील प्रस्तावित सौर प्रकल्प गुजरातला हलविण्याचा दावा फेटाळला

कंपनी म्हणते गुंतवणूक वाढविणार

गडचिरोली : नागपुरातील प्रस्तावित 15 हजार कोटी रुपयांचा सौरउर्जा प्रकल्प गुजरातमध्ये हलविण्यात आल्याचा दावा रिन्यू कंपनीने फेटाळून लावला आहे. उलट राज्यात आगामी प्रकल्पांमध्ये 1 लाख कोटीपर्यंत गुंतवणूक करणार असल्याचे कंपनीने प्रसिद्धी पत्रकातून स्पष्ट केले.

द रिन्यूने लेखी निवेदनात म्हटले आहे की, ‘महाराष्ट्र सरकारशी चर्चा अपूर्ण राहिल्याने किंवा उच्च वीज दरांमुळे आम्ही महाराष्ट्रात गुंतवणूक करणार नाही, असे आम्ही सांगितलेले वृत्त पूर्णपणे खोटे आहे.’ ही माहिती केवळ दिशाभूल करणारी नाही तर अत्यंत बेजबाबदार असल्याचे कंपनीतर्फे सांगण्यात आले.

महाराष्ट्रात आम्ही सौरउर्जेतील अपस्ट्रीम व्हॅल्यू चेनमध्ये गुंतवणूक करणार आहोत. ही महाराष्ट्रातील सर्वात मोठी कंपनी आहे आणि आमची महाराष्ट्राशी बांधिलकी आहे. महाराष्ट्रात आम्ही 550 मेगावॅट क्षमतेची यंत्रणा बसवली असून आणखी 2000 मेगावॅटचे बांधकाम सुरू आहे. 2026 पर्यंतची ही योजना आहे, त्यासाठी 15,000 कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाणार आहे. याशिवाय पंप स्टोरेज, ग्रीन डायहाइड्रोजन या क्षेत्रातही आम्ही काम करणार आहोत. यातून राज्यात 30 हजार रोजगार निर्माण होतील. कंपनी महावितरणला स्पर्धात्मक दराने 550 मेगावॅट वीज पुरवत असून, सध्याचे प्रकल्प आणि आगामी प्रकल्पांच्या दृष्टीने आम्ही राज्यात 1 लाख कोटींची गुंतवणूक करणार आहोत, असे कंपनीच्या वतीने स्पष्ट करण्यात आले.