जिल्ह्यातील विविध प्रश्नांवर काँगेसचे गडचिरोलीत धरणे व चक्काजाम आंदोलन

रस्ते दुरुस्तीसह इतर मागण्यांचा समावेश

गडचिरोली : जिल्ह्यातील राष्ट्रीय व राज्य महामार्गांची दुरवस्था झाल्याने नागरिकांना असह्य त्रास सहन करावा लागत आहे. यात अनेक नागरिकांना नाहक जीव गमवावा लागला. त्यामुळे जिल्ह्यातील रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करावी, यासह इतर प्रमुख मागण्यांसाठी गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीच्या शुक्रवारी गडचिरोलीच्या इंदिरा गांधी चौकात धरणे व चक्काजाम आंदोलन करण्यात आले. जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांच्या नेतृत्वात आणि खासदार डॉ.नामदेव किरसान यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या आंदोलनात जिल्हाभरातील काँग्रेसच्या विविध सेलचे पदाधिकारी सहभागी झाले होते.

गडचिरोली ते आरमोरी, आष्टी ते अहेरी-सिरोंचा हा राष्ट्रीय महामार्ग आणि चामोर्शी-मूल या राज्यमार्गासह जिल्ह्यातील इतरही रस्त्यांची दुरूस्ती, सुरजागड येथून चालणाऱ्या जड वाहतुकीने रस्त्यांची झालेली चाळण आणि अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी उपाययोजना करणे, अतिदुर्गम व मागास जिल्हा असूनसुद्धा रस्ते विकासाकरीता इतर जिल्ह्यांच्या तुलनेत मिळालेला अल्प निधी, कंत्राटदारांची देयके देण्यासाठी निधी उपलब्ध करून देणे, घरकूलधारकांच्या खात्यात तात्काळ पैसे जमा करणे, वारंवार मागणी आणि आंदोलन करूनसुद्धा रानटी हत्तींचा त्रास कमी करण्यासाठी उपाययोजना करणे, रेल्वेमार्गाच्या उभारणीमुळे होत असलेल्या शेतकऱ्यांच्या नुकसानीसाठी भरपाईचे देणे, कोनसरी परीसरातील शेतकऱ्यांना जमीन अधिग्रहणाचा योग्य मोबदला देणे, खिळखिळ्या झालेल्या आरोग्य व्यवस्थेत सुधारणा करणे, शेतकऱ्यांच्या कृषीपंपाला किमान 12 तास नियमित वीजपुरवठा करणे, पुरेशा बसेसची व्यवस्था नसल्याने नागरिकांना आणि शाळकरी विद्यार्थ्याना होत असलेला त्रास थांबविण्यासाठी अतिरिक्त बसेस उपलब्ध करून देणे आदी मागण्यांकडे आंदोलनाच्या माध्यमातून लक्ष वेधण्यात आले.

यावेळी माजी आ.आनंदराव गेडाम, माजी जि.प.उपाध्यक्ष मनोहर पोरेटी, शहर अध्यक्ष सतीश विधाते, माजी जि.प. उपाध्यक्ष जीवन नाट, काँग्रेस नेते हसनअली गिलानी, शंकरराव सालोटकर, प्रदेश युवक काँग्रेसचे सचिव विश्वजीत कोवासे, अतुल मल्लेलवार, छगन शेडमाके, वामनराव सावसाकडे, रामदास मसराम, केसरी उसेंडी, सुनील चडगुलवार, तालुकाध्यक्ष मिलिंद खोब्रागडे, वसंत राऊत, मनोज अग्रवाल, राजेंद्र बुल्ले, प्रमोद भगत, प्रशांत कोराम, नेताजी गावतुरे, अनिल कोठारे, रजनीकांत मोटघरे, हरबाजी मोरे, संजय चन्ने, रुपेश टिकले, घनश्याम वाढई, तेजस मडावी, कुसुम आलाम, डॉ.सोनल कोवे, पुष्पलता कुमरे, उषा धुर्वे, मंगला कोवे, अपर्णा खेवले, भारत येरमे, अब्दुल पंजवाणी, सुभाष धाईत, उत्तम ठाकरे यांच्यासह मोठ्या संख्येने काँग्रेस कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते.