गडचिरोली : भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केलेल्या संविधानातील सामाजिक न्याय, लोकशाही आणि धर्मनिरपेक्षता या मूल्यांवर आधारित समाज निर्मिती करणे हाच रिपब्लिकन पक्षाचा अजेंडा आहे. त्याच मार्गाने पक्षाची वाटचाल गेल्या अनेक वर्षांपासून सुरु आहे. देशातील दलित, मागासवर्गीय व दुर्लक्षित लोकांचा आवाज हीच रिपब्लिकन पक्षाची खरी ओळख आहे, असे प्रतिपादन अखिल भारतीय रिपब्लिकन पक्षाचे केंद्रीय उपाध्यक्ष अशोक निमगडे यांनी केले.
बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त येथील केमिस्ट भवनात घेण्यात आलेल्या पक्षाच्या जिल्हास्तरीय कार्यकर्ता मेळाव्यात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी पक्षाचे जिल्हाध्यक्ष हंसराज उंदीरवाडे, तर केंद्रीय उपाध्यक्ष रोहिदास राऊत, केंद्रीय सदस्य विशालचंद्र अलोणे, प्रदेश उपाध्यक्ष प्राचार्य प्रकाश दुधे, प्रदेश सचिव केशवराव सामृतवार, महिला आघाडीच्या नेत्या सुरेखा बारसागडे प्रामुख्याने उपस्थित होते.
बाबासाहेबांनंतर बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांनी रिपब्लिकन पक्ष संपूर्ण देशभर पसरविला. या पक्षाला एक मोठा इतिहास आणि परंपरा आहे. पक्षाने मोठमोठी देशव्यापी आंदोलने करून आपला एक दबदबा निर्माण केला होता. संसद आणि विधानसभेतही या पक्षाचे प्रतिनिधी होते. शोषित, पीडित जनता हा या पक्षाचा मुलाधार आहे आणि या लोकांच्या जोरावरच रिपब्लिकन पक्ष पुन्हा एकदा आपले स्थान निर्माण करेल, असा आशावाद रोहिदास राऊत यांनी व्यक्त केला. गटातटात विखरलेल्या नेत्यांनी एकसंघ रिपब्लिकन पक्ष उभा करावा, आगामी निवडणुका आघाडी करून लढाव्या, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
प्रास्ताविक प्रा.प्रकाश दुधे यांनी तर संचालन प्रा.राजन बोरकर यांनी केले. आभार प्रदर्शन प्रदीप भैसारे यांनी केले. कार्यक्रमाला जिल्हा सरचिटणीस प्रल्हाद रायपुरे, कार्यालय सचिव अशोक खोब्रागडे, संघटक हेमंत सहारे, युवक आघाडीचे नरेंद्र रायपुरे, महिला आघाडीच्या अध्यक्ष नीता सहारे, सरचिटणीस ज्योती उंदीरवाडे, वनमाला झाडे, ज्योती चौधरी, कल्पना रामटेके, श्यामराव वालदे, सिध्दार्थ खोब्रागडे, तैलेश बांबोळे, अरुण भैसारे, साईनाथ गोडबोले, कृष्णा सहारे, चंद्रभान राऊत, दादाजी धाकडे, कविता वैद्य आदींसह जिल्हाभरातील कार्यकर्ते उपस्थित होते.