महिलांनी उद्योगातून आर्थिक उन्नती साधावी, भाग्यश्री आत्राम यांचे आवाहन

संकल्प सप्ताह-समृद्धी दिवस साजरा

आलापल्ली : ग्रामीण भागातील महिलांची शाश्वत उपजीविका वृद्धिंगत करण्यासाठी राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका अभियान राबविले जाते. या माध्यमातून शाश्वत शेती, पशुपालन, मत्स्यपालन, प्रक्रिया उद्योग याकरिता व्यक्तिगत व सामुहिक उपजीविका उपक्रमातून उत्पन्न वाढीसाठी तांत्रिक मार्गदर्शन व अर्थसहाय्य करण्यात येते. त्या माध्यमातून महिलांनी उद्योगातून आर्थिक उन्नती साधावी, असे आवाहन माजी जि.प. अध्यक्ष भाग्यश्री आत्राम यांनी केले.

उमेद-महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, पंचायत समिती अहेरीअंतर्गत जननी महिला प्रभाग संघ आलापल्लीतर्फे ग्रामपंचायत भवनात संकल्प सप्ताह-समृद्धी दिवस साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या म्हणून त्या बोलत होत्या.

कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून जननी महिला प्रभाग संघाच्या अध्यक्ष वंदना राजेश आत्राम, तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून तालुका व्यवस्थापक सतीश उमरे, ग्रा.पं. सदस्य पुष्पा अलोने, माजी सरपंच सुगंधा मडावी, शकुंतला दुर्गम, प्रभाग समन्वयक शालिनी लोणारे, प्रतिमा गावतुरे, प्रियांका गोंगले, गीता कविराजवार, लक्ष्मी रामटेके, राजश्री जनकर, लैजा बोरूले, अनुशा करपे आदी उपस्थित होते.

महिला बचत गट अधिकाधिक प्रगतीपथावर गेल्यास महिला सक्षम होतील. या माध्यमातून अन्य महिलांना देखील प्रोत्साहन मिळेल. तसेच केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजनांचा लाभ महिलांनी घेतला पाहिजे, असे आवाहन देखील भाग्यश्री आत्राम यांनी यावेळी केले. प्रास्ताविक सतीश उमरे, संचालन मनीषा जंबेवार तर आभार मनिषा दुर्गे यांनी मानले.

बचत गटांना धनादेशाचे वाटप


बचत गटाच्या महिलांच्या उद्योगधंद्यात वाढ करण्याच्या दृष्टीकोनातून ८ गटांना प्रत्येकी ७५ हजार रुपयांचा धनादेश यावेळी वितरित करण्यात आला. संकल्प सप्ताह निमित्ताने १७ महिलांचे वैयक्तिक बँक खाते उघडण्यात आले. तसेच प्रधानमंत्री जीवनज्योती विमा, प्रधानमंत्री जीवन सुरक्षा विमाअंतर्गत १४८ महिलांचे विमा काढण्यात आले.

प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेची दिली माहिती
ग्राम संघांना अधिक सक्षम करण्यासाठी प्रशिक्षण देऊन त्यांना प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेअंतर्गत ५ टक्के व्याजदरात तीन लाख रुपयांपर्यंत कर्ज देण्यात येते. त्यात पहिला हप्ता १ लाख, दुसरा हप्ता २ लाख आणि तिसरा हप्ता ३ लाख अशा प्रकारे काही प्रशिक्षण पूर्ण केलेल्या महिलांना देण्यात येतो. या योजनेची सविस्तर माहिती यावेळी देण्यात आली.