चामोर्शीत अगरबत्ती उद्योगाच्या नावावर महिलांची फसवणूक?

40 वर महिलांच्या नावे उचलले कर्ज

गडचिरोली : चामोर्शी येथे अगरबत्ती उद्योगासाठी महिलांना खोटी माहिती देत त्यांच्या सह्या घेऊन त्यांच्या नावावर कर्ज उचलण्याचा प्रकार उघडकीस आला. यात 40 पेक्षा जास्त महिलांनी आपली फसवणूक झाली, असे सांगत या प्रकरणी न्याय न मिळाल्यास आत्मदहन करण्याचा इशारा पत्रकार परिषदेत दिला आहे. यावेळी त्यांनी चामोर्शीतील भाजपचे नगरसेवक आशिष पिपरे यांच्यावर गंभीर आरोप केले.

पीडित महिलांच्या म्हणण्यानुसार, आशिष पिपरे यांनी त्यांना अगरबत्ती व्यवसायासाठी मशिनरी खरेदी करून देण्याचे आणि त्यातून चांगले उत्पन्न होईल असे आमिष दाखविले. त्यासाठी त्यांच्या नावाने बँकेकडून कर्ज घेण्यात आले. पण बँकेची नोटीस येईपर्यंत आपल्या नावाने कर्ज घेतले याची माहितीसुद्धा बऱ्याच महिलांना नव्हती. यासंदर्भात त्यांनी विचारले असता ते कर्ज माफ होईल, अशा भूलथापा त्यांना देण्यात आल्या. परंतू कर्जासह थकित व्याजाची रक्कम भरण्याची नोटीस मिळाल्याने आपली फसवणूक झाल्याची भावना संबंधित महिलांमध्ये निर्माण झाली.

याशिवाय ट्रॅक्टर खरेदी-विक्री व्यवहार, तसेच चिचडोह बॅरेजमध्ये अधिग्रहित केलेल्या जमिनीचा मोबदला मिळवून देण्याचे सांगत फसवणूक झाल्याचा दावाही महिलांनी केला. या सर्व प्रकरणात पोलिसांकडे तक्रार केली, पण अद्याप दखल घेतल्या गेली नाही. त्यामुळे न्याय न मिळाल्यास आत्मदहन करण्याचा इशारा या महिलांनी दिला आहे.

पत्रकार परिषदेला कविता किरमे, दिलीप किरमे, वंदना कोठारे, शालिनी पिपरे आदी महिला प्रामुख्याने उपस्थित होत्या.

पिपरे म्हणतात, हे आरोप राजकीय हेतूने

या प्रकरणात नगरसेवक आशिष पिपरे यांनी आपली बाजू मांडताना सर्व आरोप फेटाळले. किरमे दाम्पत्य नगर पंचायतच्या निवडणुकीत हारल्यानंतर त्यांच्याकडून आपली राजकीय प्रतिमा डागाळण्याचा प्रयत्न सुरू आहे. महिलांची फसवणूक झाली असेल तर पोलीस आणि न्यायालयात दाद मागावी, असे म्हणत त्यांनी माझी बदनामी करणाऱ्यांविरूद्ध कायदेशिर कारवाई करणार असल्याचे सांगितले.