आश्रमशाळांचा खालावलेला शैक्षणिक दर्जा उंचावणार

मंत्री प्रा.उईके यांचा विश्वास

योजनेच्या लाभार्थी महिलेला प्रमाणपत्र देऊन संवाद साधताना मंत्री उईके. सोबत मा.खा.डॅा.नेते, जिल्हाधिकारी पंडा, एटीसी आयुषी सिंह.
आभासी पद्धतीने कार्यालय इमारती आणि वसतिगृहांचे लोकार्पण करताना मंत्री प्रा.अशोक उईके

गडचिरोली : राज्यातील शासकीय आदिवासी आश्रमशाळांमधील शैक्षणिक दर्जा चांगलाच खालावला आहे. सातवीच्या विद्यार्थ्याला दुसरीचे पुस्तक वाचता येत नाही, असा निष्कर्ष ‘असर’ या संस्थेने केलेल्या तपासणीत निघाला आहे, अशी माहिती आदिवासी विकासमंत्री प्रा.डॅा.अशोक उईके यांनी दिली. मात्र हे चित्र यावर्षी राहणार नाही आणि आश्रमशाळांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. गडचिरोलीत बुधवारी (दि.30) आदिवासी लाभार्थ्यांचा मेळावा आणि आभासी पद्धतीने विविध विकास कामांच्या झालेल्या लोकार्पणप्रसंगी ते बोलत होते.

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प गडचिरोली, अहेरी व भामरागड यांच्या संयुक्त विद्यमाने प्रधानमंत्री जनजातीय न्याय महाअभियान व धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियानांतर्गत लाभार्थी मेळावा, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प भामरागडच्या कार्यालयीन, तसेच शालेय इमारत व मुलींच्या वसतिगृहाचे लोकार्पण, गडचिरोली प्रकल्पांतर्गत शासकीय आश्रमशाळा सोडे, रेगडी, कारवाफा येथील मुला-मुलींच्या वसतीगृहाचे लोकार्पण तसेच शासकीय आश्रमशाळा घाटी, येरमागड, भाडभिडी, अंगारा येथील मुला-मुलींचे वसतिगृह, तसेच अहेरी प्रकल्पांतर्गत शासकीय आश्रमशाळा बाम्हणी, गुड्डीगुड्डम येथील मुला-मुलींचे वसतिगृह, भामरागड प्रकल्पांतर्गत शासकीय आश्रमशाळा कोठी, जांबिया येथील मुलांच्या वसतिगृहाच्या बांधकामाचे भूमिपूजन मंत्री डॉ.उईके यांच्या हस्ते आभासी पद्धतीने करण्यात आले. तसेच नीति आयोगाअंतर्गत आकांक्षित तालुका व जिल्हा संपूर्णत: अभियान सन्मान सोहळा आणि रानभाजी महोत्सवाचे उद्घाटन येथील सुमानंद सभागृहात प्रा.उईके यांच्या हस्ते पार पडले.

गडचिरोली जिल्ह्याच्या विकासाला गती देण्यासाठी ‘पीएम जनमन’ आणि ‘धरती आबा’ या केंद्र सरकारच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करा, या योजनांच्या लाभापासून एकही आदिवासी वंचित राहू नये, असे निर्देश मंत्री प्रा.अशोक उईके यांनी यावेळी यंत्रणेला दिले.

यावेळी आमदार सुधाकर अडबाले, आमदार डॉ.मिलिंद नरोटे, माजी खासदार तथा भाजपचे राष्ट्रीय महामंत्री (एसटी मोर्चा) अशोक नेते, जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा, आदिवासी विकास विभागाच्या अपर आयुक्त (नागपूर) आयुषी सिंह, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे, सहाय्यक जिल्हाधिकारी तथा गडचिरोलीचे प्रकल्प अधिकारी रणजित यादव, सहाय्यक जिल्हाधिकारी तथा अहेरीचे प्रकल्प अधिकारी कुशल जैन, सहाय्यक जिल्हाधिकारी तथा भामरागडचे प्रकल्प अधिकारी नमन गोयल, चंद्रपूर सार्वजनिक बांधकाम विभागाचे (आदिवासी) कार्यकारी अभियंता नितीन मुत्यालवार प्रामुख्याने उपस्थित होते.

‘धरती आबा’ योजनेचे 100 टक्के अंमलबजावणीचे लक्ष्य

‘धरती आबा’ योजनेची गडचिरोली जिल्ह्यातील 411 गावांमध्ये प्रभावी अंमलबजावणी करण्याचे आवाहन डॉ.उईके यांनी केले. येत्या 15 तारखेला होणाऱ्या ग्रामसभांमध्ये या योजनेचे नियोजन केल्यास राज्यात गडचिरोली जिल्हा 100 टक्के अंमलबजावणीसह पहिला क्रमांक पटकावेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यासाठी ग्रामसभांनी आतापासूनच नियोजनाचा कृती आराखडा तयार करावा, असे आवाहनही त्यांनी केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आदिवासी व्यक्तीला केंद्रस्थानी ठेवून सुरू केलेल्या या योजनांमधून 25 पेक्षा अधिक लाभ 17 विभागांद्वारे देण्यात येणार आहेत. या योजनांच्या लाभापासून एकही आदिवासी माणूस वंचित राहणार नाही, याची खात्री करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

शिक्षण आणि संस्कृतीला प्राधान्य

येणाऱ्या 5 आॅगस्टपर्यंत पात्र शिक्षकांची आश्रमशाळांमध्ये नियुक्ती होईल आणि त्यामुळे शाळेची गुणवत्ता अधिक सुधारेल. तसेच, येत्या काळात इंग्रजी माध्यमाच्या शासकीय आश्रमशाळाही सुरू करण्याचे संकेत त्यांनी दिले. प्रत्येक अधिकाऱ्याने एक आश्रमशाळा किंवा वसतिगृह दत्तक घेऊन तेथील अडचणी सोडवाव्यात, अशी सूचनाही त्यांनी केली.

आमदार डॉ.नरोटे यांनी आदिवासी विकास विभागाचा जास्तीत जास्त निधी शेती, सिंचन व शिक्षणावर खर्च व्हावा अशी अपेक्षा व्यक्त केली. आमदार अडबाले यांनी आदिवासी विभागात पदभरतीचा मार्ग मोकळा केल्याबद्दल मंत्री डॉ.उईके यांचे आभार मानले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रकल्प अधिकारी रणजित यादव यांनी तर संपूर्णत: अभियान सन्मान सोहळ्याचे प्रास्ताविक जि.प.चे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भुयार यांनी केले. यावेळी वनधन केंद्र देवराईचे संचालक सुरेश पुंगाटी, केळीगट्टा वनहक्क समितीचे अध्यक्ष सोमनाथ गावळे यांनीही मनोगत व्यक्त केले.

या कार्यक्रमात विविध योजनांच्या लाभार्थ्यांना धनादेश आणि पीएम जनमन आवास योजनेअंतर्गत गृहप्रवेशाच्या चाव्या वितरित करण्यात आल्या. कार्यक्रमाचे संचालन अनिल पोटे व शेषराव नागमोती यांनी, तर आभार सहायक प्रकल्प अधिकारी डॉ.प्रभू सादमवार यांनी मानले. एकलव्य रेसिडेन्शियल पब्लिक स्कूल चामोर्शीच्या मुलींनी पारंपरिक आदिवासी नृत्य सादर केले.

या कार्यक्रमाला आदिवासी विकास विभाग नागपूरचे उपायुक्त दिगांबर चव्हाण, माजी आमदार डॉ.देवराव होळी, माजी आमदार डॉ.नामदेव उसेंडी, समाजसेविका कुसुम आलाम, भाजपचे जिल्हाध्यक्ष रमेश बारसागडे, प्रशांत वाघरे, प्रकाश गेडाम, बाबुराव कोहळे, चंद्रपूरचे प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार, वर्धाचे प्रकल्प अधिकारी दीपक हेडाऊ, चिमूरचे प्रकल्प अधिकारी प्रवीण लाटकर, भंडाराचे प्रकल्प अधिकारी नीरज मोरे आदी उपस्थित होते.

कार्यक्रमासाठी सहाय्यक प्रकल्प अधिकारी वहीद शेख, नियोजन अधिकारी प्रफुल पोरेड्डीवार, वासुदेव उसेंडी, दादाजी सोनकर, मुकेश गेडाम, सुधीर शेंडे, संतोष कन्नाके, कार्तिक कोवे, प्रकाश अक्यमवार व प्रकल्प कार्यातील कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.