गडचिरोली : माजी खासदार तथा भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ.अशोक नेते यांनी नवी दिल्ली येथील भाजपा मुख्यालयात भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी त्यांनी नबीन यांच्याशी गडचिरोली–चिमूर लोकसभा क्षेत्रातील सद्यस्थिती, पक्षाची संघटनात्मक बांधणी, कार्यकर्त्यांचा सहभाग तसेच आगामी काळातील संघटनात्मक उपक्रम याबाबत सविस्तर व मनमोकळा संवाद साधला.
गडचिरोली–चिमूर हा भौगोलिकदृष्ट्या विस्तीर्ण तसेच आदिवासी व ग्रामीणबहुल लोकसभा मतदारसंघ असून, या भागातील प्रत्येक बूथपर्यंत पक्षाची संघटनात्मक ताकद अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने विविध विषयांवर यावेळी चर्चा झाली. बूथस्तरापासून मंडल व विधानसभा स्तरापर्यंत संघटन अधिक गतिमान करणे, नव्या कार्यकर्त्यांना पक्षाच्या विचारधारेसोबत जोडणे आणि केंद्र व राज्य सरकारच्या लोककल्याणकारी योजना सर्वसामान्य नागरिकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविणे, याबाबतही विचारविनिमय करण्यात आला.
तसेच अनुसूचित जनजाती समाजाच्या विकासासाठी केंद्र सरकारच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या विविध योजना व उपक्रमांचा लाभ दुर्गम आणि ग्रामीण भागातील नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी पक्ष संघटनेने अधिक प्रभावीपणे कार्य करण्याची आवश्यकता यावरही चर्चा झाली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकार आणि महाराष्ट्रात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारच्या विकासाभिमुख कार्याची माहिती जनतेपर्यंत पोहोचविताना संघटनेतील प्रत्येक कार्यकर्ता हा महत्त्वाचा दुवा आहे, या भूमिकेतून आगामी काळातील संघटनात्मक वाटचालीबाबत यावेळी सकारात्मक चर्चा झाली.
गडचिरोली–चिमूर लोकसभा क्षेत्रातील विविध विधानसभा मतदारसंघांमध्ये पक्षाची संघटनात्मक स्थिती अधिक मजबूत करण्यासोबतच कार्यकर्ता संपर्क, जनसंपर्क, संघटन विस्तार आणि बूथ सक्षमीकरण या विषयांवर विशेष भर देण्याबाबतही चर्चा करण्यात आली. डॉ.अशोक नेते यांच्या संघटनात्मक कार्याचा अनुभव, आदिवासी व ग्रामीण भागातील व्यापक जनसंपर्क आणि पक्षाच्या विविध जबाबदाऱ्यांच्या माध्यमातून त्यांनी केलेल्या कार्याबाबतही यावेळी सकारात्मक संवाद झाला.
भाजपा राष्ट्रीय मुख्यालयात झालेल्या या भेटीत गडचिरोली–चिमूर लोकसभा क्षेत्रातील संघटन अधिक मजबूत करण्यासाठी आगामी काळात नियोजनबद्ध पद्धतीने कार्य करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. पक्षाच्या विचारधारेवर निष्ठा ठेवून प्रत्येक कार्यकर्त्याला सोबत घेऊन संघटन विस्ताराचे कार्य अधिक जोमाने पुढे नेण्याच्या दृष्टीने ही भेट महत्त्वपूर्ण मानली जात आहे.
































