गडचिरोली : आदिवासीबहुल व माओवादग्रस्त जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या जिल्ह्रातील दुर्गम-अतिदुर्गम भागात राहणाऱ्या नागरिकांना प्रवासाचे साधन उपलब्ध नसल्याने नेहमीच पायपीट करत प्रवास करावा लागतो. अशा दुर्गम भागातील नागरिकांचे जगणे सुसह्य व्हावे यासाठी गडचिरोली पोलीस दलाकडून विविध उपक्रम राबविले जात असतात. त्याअंतर्गत शनिवारी कटेझरी ते गडचिरोली अशी बससेवा सुरू करण्यात आली. गावात पहिल्यांदा आलेल्या बसचे वाजत-गाजत स्वागत करण्यात आले.
अतिदुर्गम कटेझरी येथील नागरिकांना तहसील किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी सहज प्रवास करता यावा यासाठी गडचिरोली पोलीस दलाच्या प्रयत्नाने व महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या सहकार्याने कटेझरी ते गडचिरोली अशी बससेवा प्रथमच सुरु करण्यात आली.
गावात स्वातंत्र्याच्या 78 वर्षानंतर पहिल्यांदा बस आल्यामुळे या भागातील नागरिकांनी मोठ्या उत्साहाने या बसचे स्वागत केले. उपविभागीय पोलीस अधिकारी जगदीश पांडे यांनी सदर बससेवेचे उद्घाटन करून गावकऱ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी कटेझरी पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी पोउपनि.अजय भोसले यांनी हिरवा झेंडा दाखवून बसला मार्गस्थ केले. या बससेवेमुळे आजुबाजूच्या 10 ते 12 गावांना लाभ होणार आहे. गावातील विद्यार्थ्यांना आता बाहेरगावी जाऊन शिक्षण घेण्याची सोय होणार आहे.
पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या संकल्पनेतून, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) यतिश देशमुख, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) एम.रमेश तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी (धानोरा) जगदीश पांडे, पोलीस उपअधीक्षक (अभियान) विशाल नागरगोजे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि कटेझरी पोलिसांच्या प्रयत्नांनी सदर उपक्रमाची सुरुवात करण्यात आली.
पोलिसांच्या सहकार्यातून रस्ते-पुलांचे बांधकाम
यावर्षी 1 जानेवारी 2025 रोजी गट्टा ते गर्देवाडा आणि त्यापुढे वांगेतुरी बससेवा देखील सुरु करण्यात आली. दुर्गम भागात मागील पाच वर्षांमध्ये 434.53 कि.मी. लांबीच्या एकूण 18 रस्त्यांसोबतच एकूण 59 पुलांचे बांधकाम पोलीस संरक्षणात पूर्ण करुन घेण्यात आले आहे.