लोहार समाजातील विविध उपक्रमांसाठी समाजमंदिर उपलब्ध करून द्या

संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचे अम्ब्रिशराव आत्राम यांना निवेदन

गडचिरोली : माजी पालकमंत्री अम्ब्रिशराव आत्राम हे रविवारी अहेरी तालुक्यातील राजाराम खांदलाच्या दौऱ्यावर आले होते. यावेळी राजाराम येथील लोहार समाज संघटनेने विविध उपक्रम राबविण्यासाठी समाजमंदिराची उभारणी करण्याची मागणी अम्ब्रिशराव यांना निवेदन देऊन केली.

वैदर्भीय गाडी लोहार व तत्सम जाती महासंघ नागपूर संलग्नित लोहार समाज संघटना राजाराम खांदला शाखेअंतर्गत राजाराम, खांदला, निमलगुडम, गुड्डीगुडम, नंदीगाव, पुसुकपल्ली, कोडशेलगुडम, कमलापूर, मांड्रा, दामरंचा येथील समाज बांधव एकत्र येत असतात. मात्र एवढा मोठा समाज एकत्रित येत असताना सामाजिक कार्यक्रम किंवा समाजाच्या मेळाव्यासाठी सभागृह नसल्यामुळे अनेक समस्या निर्माण होतात. एखादी जागा किंवा इमारत भाड्याने घ्यावी लागते. त्याकरिता लोहार समाजमंदिर गरजेचे आहे, अशी भावना नागरिकांनी मांडली.

लोहार समाज आर्थिक, राजकीय, सामाजिक, शैक्षणिकदृष्ट्या मागसला असून समाजाच्या विकासावर मंथन करण्यासोबत महिलांचे हळदी कुंकू कार्यक्रम किंवा इतर उपक्रम असो, एकत्रित येण्यासाठी समाजमंदिराची गरज असल्याचे सांगत राजाराम शाखेचे मुख्य सल्लागार शंकर चंदनखेडे, तालुकाध्यक्ष प्रा.विनोद बावणे, विदर्भ संघटक ईश्वर मांडवकर यांच्या मार्गदर्शनाखाली माजी राज्यमंत्री अम्ब्रिशराव आत्राम यांना निवेदन देण्यात आले. अम्ब्रिशराव यांनी ही समस्या लवकरच दूर करू असे आश्वासन यावेळी दिले.

निवेदन देताना संघटनेचे अध्यक्ष रमेश बामनकर, उपाध्यक्ष राकेश कोसरे, साईबाबा बामनकर, कार्याध्यक्ष गोपाल चंदनखेडे, युवाध्यक्ष आशिष चंदनखेडे, सचिव दिलीप मेश्राम, कोषाध्यक्ष विश्वास मेश्राम, महिला अध्यक्ष रेणुका बामनकर, महिला सल्लागार अक्कुबाई बामनकर, मंगला बामनकर, देवाजी बामनकर, विठ्ठल बामनकर, सरिता बामनकर, विलास बामनकर, गंगाराम चंदनखेडे, अशोक बामनकर, सुनील बामनकर, रामबाई बामनकर, शोभा चंदनखेडे, नितेश चंदनखेडे, तसेच नंदीगाव, निमलगुडम, गुड्डीगुडम, कमलापूर, खांदला, पुसुकपल्ली, कोडशेलगुडम येथील समाज बांधव उपस्थित होते.