रानटी हत्तींच्या नुकसानभरपाईची आठ वर्षांपूर्वीची कमाल मर्यादा वाढवून द्या

आ.कृष्णा गजबे यांनी वनमंत्र्यांना घातले साकडे

देसाईगंज : जिल्ह्यातील कोरची, कुरखेडा, आरमोरी व देसाईगंज या वडसा वन विभागांतर्गत येत असलेल्या जंगलव्याप्त तालुक्यांमध्ये अलिकडे जंगली हत्तींचा मोठ्या प्रमाणात संचार वाढलेला आहे. चारही तालुक्यात जंगली हत्तींनी अतिक्रमणीत शेतजमिनीसह शेतपिकाचे प्रचंड नुकसान केले आहे. मात्र शासन निर्णयातील तरतुदीनुसार २५ हजारांच्या कमाल मर्यादेत भरपाई देण्यात येत असल्याने याचा जबर फटका शेतकऱ्यांना बसत आहे. त्यामुळे या भरपाईच्या रकमेत वाढ करून द्या, असे साकडे आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार कृष्णा गजबे यांनी राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना निवेदनातून घातले आहे.

सदर निवेदनात नमुद केल्यानुसार, हा चारही तालुक्यांचा परिसर उद्योगविरहीत असून येथील शेतकऱ्यांची उपजिवीका शेतीवर अवलंबून आहे. असे असताना संदर्भिय शासन निर्णयातील तरतुदीनुसार २५ हजारांच्या कमाल मर्यादेत नुकसानभरपाई देण्यात येत आहे. ही भरपाई नुकसानीच्या प्रमाणात अतिशय कमी आहे. सदर भरपाई ही ८ वर्षापूर्वीच्या उत्पादन खर्चावर आधारित आहे. सद्यस्थितीत उत्पादन खर्चात प्रचंड वाढ झाली असल्याने झालेल्या नुकसानीच्या मानाने अत्यल्प भरपाई देण्यात येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठे नुकसान सहन करावे लागत आहे.

दरम्यान अनेक शेतकरी शेतजमिनीवर अतिक्रमण करून तसेच काबील कास्तकार प्रकारच्या जमिनीवर शेती करीत आहेत. मात्र संबंधित शेतकऱ्यांकडे सदर शेतजमिनीचा सातबारा उपलब्ध नसल्याने वन विभागाकडून झालेल्या नुकसानीचा पंचनामा करून भरपाई देताना अनेक अडचणी निर्माण होऊ लागल्या आहेत. यामुळे संबंधित शेतकरी जंगली हत्तींच्या उपद्रवामुळे पुरते रस्त्यावर येण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. यातून ते आत्महत्येस प्रवृत्त होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

ही गंभीर बाब लक्षात घेता व जंगली हत्तींनी उभ्या शेतपिकाचे व फळझाडांचे केलेले नुकसान लक्षात घेता भरपाईच्या रकमेत एक लाख रुपयांपर्यंत वाढ करण्यात यावी, तसेच नुकसानग्रस्त अतिक्रमणीत शेतकऱ्यांची संबंधित तलाठी कार्यालयात अतिक्रमणधारक शेतकरी म्हणून असलेल्या नोंदी ग्राह्य धरून त्यांना विशेष बाब म्हणून नुकसानभरपाई देण्याची मागणी आमदार गजबे यांनी ना.सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे केली आहे.