जिल्हाभरात 29 मार्गांवरची वाहतूक ठप्प, 200 पेक्षा जास्त गावांचा संपर्क तुटला

पर्लकोटाच्या पाण्याने भामरागड जलमय

पर्लकोटा नदीचे पाणी भामरागडमध्ये शिरल्याने जलमय झालेली भामरागडची बाजारपेठ

गडचिरोली : जिल्ह्यात सर्वदूर गेल्या तीन दिवसांपासून कोसळत असलेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. गडचिरोलीवरून आरमोरी आणि चामोर्शी मार्गासह जिल्हाभरातील 29 मार्गांवरील वाहतूक पुलावरून वाहणाऱ्या आणि खोलगट रस्त्यांवर साचलेल्या पाण्यामुळे ठप्प झाली आहे. दरम्यान भामरागडच्या पर्लकोटा नदीचे पाणी दुपारी पुलावर चढल्यानंतर झपाट्याने वाढत गेले. त्यामुले संध्याकाळी 6 वाजेपर्यंत हे पाणी भामरागडमधील बाजारपेठेत शिरले. त्यामुळे दुकानदारांची एकच धावपळ झाली. रात्रभर भामरागडचा नदीकडील भाग जलमय अवस्थेत होता. रस्त्यांवरील वाहतूक ठप्प झाल्यामुळे 200 पेक्षा जास्त गावांचा तालुका मुख्यालयाशी संपर्क तुटला आहे.

शनिवारी सकाळी घेतलेल्या नोंदीनुसार जिल्हाभरात 24 तासात सरासरी 79 मिमी पावसाची नोंद झाली. त्यात 7 तालुक्यांमध्ये अतिवृष्टी झाली आहे. गडचिरोली शहरासह अनेक गावांमधील सखल भागात पाणी साचल्याचे चित्र रविवारी सकाळी होते. गोसेखुर्द, चिचडोह, मेडीगड्डा या धरणांमधून सर्व गेट उघडून पाण्याचा विसर्ग सुरू असल्यामुळे पुराच्या पाण्यात आणखी भर पडली आहे.

या 29 मार्गांवरील वाहतूक आहे बंद

१) आलापल्ली –भामरागड राष्ट्रीय महामार्ग (कुडकेली नाला व चंद्रा नाला, ता.भामरागड) 2) अहेरी मोयाबिनपेठा रस्ता (वट्रा नाला ता.अहेरी) 3) कुरखेडा तळेगाव चारभट्टी रस्ता (ता.कुरखेडा) 4) आलापल्ली ते सिरोंचा राष्ट्रीय महामार्ग (गोलांकर्जी ते रेपनपल्ली भाग) ता.अहेरी 5) जारावंडी ते राज्य सीमा भाग (ता.धानोरा) 6) पोर्ला ते वडधा रस्ता ता.कुरखेडा 7) वैरागड ते जोगीसाखरा, शंकरपूर, चोप, कोरेगाव रस्ता (ता.देसाईगंज) 8) कुरखेडा ते वैरागड (ता.कुरखेडा) 9) करवाफा ते पोटेगाव रस्ता 10) गोठणगाव ते सोनसुरी रस्ता (ता.कुरखेडा) 11) वडसा ते नवरगाव, आंधळी, चिखली रस्ता (ता.देसाईगंज) 12) लखमापूर बोरी ते गणपुर, (हळदीमाल नाला) 13) भामरागड ते हेलमकसा व इतर भाग राष्ट्रीय महामार्ग (पर्लकोटा नदी) 14) रामगड ते सोनसरी, उरांडी रस्ता 15) भेंडाळा ते अनखोडा रस्ता (ता.चामोर्शी16) मुल हरणघाट रस्ता दहेगाव नाला ता. चामोर्शी 17) चांदेश्र्वर टोला रस्ता (ता.चामोर्शी) 18) फोर्कुडी ते मार्कंडादेव रस्ता (ता.चामोर्शी) 19) वडसा ते नैनपूर, विठ्ठलगांव रस्ता (ता.कुरखेडा) 20) चिखली ते धामदीटोला रस्ता (ता.कुरखेडा) 21) गोठणगाव ते चांदगाव रस्ता (ता.आरमोरी) 22) आरमोरी ते रामाळा रस्ता (ता.आरमोरी) 23) वैरागड ते कढोली रस्ता (ता.आरमोरी ) 24) ठाणेगाव ते वैरागड रस्ता 25) भाडभिडी ते रेगडी देवदा रस्ता (ता.चामोर्शी) 26) कोनसरी ते जामगड रस्ता (ता.चामोर्शी) 27) सारखेडा ते भापडा रस्ता (ता.धानोरा), 28) गडचिरोली ते आरमोरी (पाल नदी), 29) गडचिरोली ते चामोर्शी (शिवणी नाला).
पेंढरी ते ढोरगट्टा रस्ता (बांडिया नदी, ता.धानोरा) हा रस्ता कालपासून बंद होता. तो रविवारी सकाळी वाहतुकीसाठी मोकळा झाला.

जिल्हाधिकाऱ्यांनी केली पूरपरिस्थितीची पाहणी

जिल्ह्यात अतिवृष्टी व पूरपरिस्थितीमुळे कोणतीही हानी होवू नये आणि नागरिकांना त्रास होवू नये म्हणून जिल्हाधिकारी संजय दैने यांनी भरपावसात विविध ठिकाणी भेटी देऊन प्रशासकीय यंत्रणेकडून आवश्यक उपाययोजना राबवून घेतल्या. यादरम्यान त्यांनी नागरिकांशी संवाद साधून त्यांना दक्षता घेण्याबाबत व मदतीबाबत आश्वस्त केले. जिल्हाधिकारी दैने यांनी चांदाळा, कुंभी, तसेच आरमोरी, देसाईगंज, कुरखेडा तालुक्यात भेटी दिल्या. यावेळी त्यांनी नागरिक व शाळकरी मुलांसोबत संवाद साधला. नागरिकांनी काळजी घ्यावी, पुलावर पाणी वाहात असताना घाईगडबडीत पूल ओलांडू नये, विजा चमकत असताना झाडाखाली उभे राहू नये, मानवी चुकांमुळे कोणतीही जिवीत व वित्त हानी होवू नये याबाबत दक्षता घेण्याचे आवाहन त्यांनी केले. तसेच प्रशासकीय यंत्रणेला परिस्थितीवर बारीक नजर ठेवून अलर्ट राहण्याचे व नागरिकांना त्रास होणार नाही याबाबत आवश्यक उपाययोजना राबविण्याचे निर्देश दिले.

अतिवृष्टीदरम्यान शाळा प्रशासनाने सुट्टीचा निर्णय घ्यावा

जिल्ह्यात अतिवृष्टीबाबत हवामान विभागाने दिलेला इशारा आणि सतत सुरू असलेल्या पावसामुळे पुरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. रविवारीही मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांची सुरक्षितता लक्षात घेता ज्या ठिकाणी शाळेच्या मार्गात नदी, नाले, पूल, रपटा यांना पाण्यामुळे अडथळा निर्माण होत असेल तेथे सर्व व्यवस्थापनाच्या शाळा व महाविद्यालयातील मुख्याध्यापकांनी स्वतः निर्णय घेऊन आवश्यकतेनुसार सोमवारी शाळा बंद ठेवण्याचे आदेश द्यावे, असे निर्देश जिल्हाधिकारी संजय दैने यांनी दिले आहेत.