
गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातील विकास कामांशी संबंधित मंत्रालयस्तरावरील सर्व प्रलंबित फाईल्स फास्टट्रॅकवर घेऊन कामांना तातडीने गती देण्याचे स्पष्ट निर्देश राज्याचे मुख्य सचिव तथा जिल्ह्याचे पालक सचिव राजेश अग्रवाल यांनी दिले. त्याचबरोबर वनहक्कधारक शेतकऱ्यांना तातडीने ‘फार्मर आयडी’ उपलब्ध करून देण्याचेही निर्देश त्यांनी दिले.
मुख्य सचिव अग्रवाल यांनी शुक्रवारी दूरदृश्य प्रणालीद्वारे (व्हीडिओ कॅान्फरन्सिंग) जिल्ह्यातील विविध विभागांच्या कामकाजाचा सखोल आढावा घेतला. जिल्हाधिकारी कार्यालयातून अपर मुख्य सचिव मनिषा म्हैसकर, जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख अधिकारी या बैठकीत सहभागी झाले होते.
यावेळी जिल्ह्यातील शासनस्तरावर प्रलंबित असलेल्या महत्त्वाच्या प्रस्तावांचा आढावा घेण्यात आला. यामध्ये महसूल, खनिकर्म, राष्ट्रीय महामार्ग, सार्वजनिक बांधकाम, क्रीडा व आरोग्य विभाग आदी विविध विभागांकडून प्रशासकीय मान्यतेसाठी पाठविण्यात आलेल्या प्रस्तावांचा समावेश होता. संबंधित विभागांनी या प्रस्तावांच्या पाठपुराव्यात गती आणावी, असे निर्देश मुख्य सचिवांनी दिले.
जिल्हा परिषद, बांधकाम, आरोग्य व इतर विभागांतील रिक्त पदे माहे मे अखेरपर्यंत जास्तीत जास्त भरण्याच्या सूचना देण्यात आल्या. तसेच वनजमिनीचे पट्टे मिळालेल्या शेतकऱ्यांना तातडीने ‘फार्मर आयडी’ देऊन विविध शासकीय योजनांचा लाभ उपलब्ध करून देण्यावर विशेष भर देण्यात आला.
जिल्ह्यातील पायाभूत सुविधा बळकट करण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग व सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत सुरू असलेल्या रस्ते व पुलांच्या कामांना समन्वयातून गती देण्याचे निर्देशही देण्यात आले. जलसंपदा विभागांतर्गत विविध प्रलंबित प्रकल्पांना प्राधान्याने मंजुरी देऊन प्रत्यक्ष कामांना वेग देण्यावर भर देण्यात आला.
घरकुल आणि सूर्यघर योजना रखडली
यावेळी केंद्र व राज्याच्या योजनांच्या अंमलबजावणीतील त्रुटी व ‘रेड फ्लॅग’ बाबींचाही आढावा घेण्यात आला. प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) व प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेतील कमी प्रगती, तसेच पीएम सूर्यघर योजनेतील अत्यल्प अंमलबजावणीबाबत मुख्य सचिवांनी गांभीर्याने लक्ष वेधले. निर्माणाधीन घरे प्राधान्याने पूर्ण करण्याचे सांगतानाच प्रलंबित घरकुल हप्त्यांसाठी केंद्र शासनाकडे पाठपुरावा करण्यात येईल असेही ते म्हणाले. जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करून निधीचा प्रभावी वापर करण्याचे निर्देश देत मुख्य सचिवांनी सर्व विभागांनी समन्वयाने व गुणवत्तापूर्ण अंमलबजावणी करण्याचे आवाहन केले.
अपर मुख्य सचिव मनिषा म्हैसकर यांनी विकास कामांच्या पूर्ततेसाठी गडचिरोली जिल्ह्याच्या विशेष दौऱ्यावर असल्याचे सांगितले. जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी सादरीकरणाद्वारे जिल्ह्यातील कामांची माहिती दिली. यावेळी मुख्य सचिव कार्यालयातून विविध विभागांचे अपर मुख्य सचिव व सचिव दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते, तर जिल्हास्तरावरील वरिष्ठ अधिकारी प्रत्यक्ष उपस्थित होते.































