गडचिरोली : भारतीय संविधानाच्या ‘अमृत महोत्सवी’ वर्षानिमित्त, गोंडवाना विद्यापीठातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर अध्यासन केंद्राच्यावतीने ‘संविधान सन्मान महोत्सव’ साजरा करण्यात येत आहे. या महोत्सवांतर्गत दि.25 व 26 मार्च रोजी दोन दिवसीय संविधान परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेमध्ये विविध कार्यक्रमाद्वारे संविधानाचा जागर होणार आहे.
25 मार्च रोजी सकाळी 11 वाजता संविधानतज्ज्ञ ॲड.सुरेश माने यांच्या हस्ते या परिषदेचे उद्घाटन होणार आहे. कुलगुरु डॉ.प्रशान्त बोकारे हे अध्यक्षस्थानी तर प्र-कुलगुरु डॉ.श्रीराम कावळे व कुलसचिव डॉ.अनिल हिरेखण यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. या परिषदेमधील विविध कार्यक्रमांना नागरीकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन कुलसचिव डॉ.अनिल हिरेखण आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर अध्यासन केंद्राचे प्रमुख डॉ.दिलीप बारसागडे यांनी केले आहे. परिषदेचे संपूर्ण नियोजन गोंडवाना विद्यापीठातील संविधान सन्मान महोत्सव समितीने केले आहे.
असे आहेत दोन दिवसातील कार्यक्रम
दि.25 मार्च रोजी सकाळी 9 वाजता संविधान दिंडी निघेल. सदर संविधान दिंडी गोंडवाना विद्यापीठ, जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा न्यायालय ते गोंडवाना विद्यापीठ अशा मार्गावरुन फिरेल. सकाळी 10.30 वाजता संविधानावर आधारित ग्रंथ प्रदर्शनीचे उद्घाटन होणार आहे.
दुपारी 12.30 वा.भारतीय संविधानाला अपेक्षित लोकशाहीचे स्वरुप या विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. अध्यक्षस्थानी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेडचे विभागप्रमुख डॉ.दिलीप चव्हाण राहतील, तर डॉ.भीमराव वाघमारे, डॉ.संतोष बनसोड, डॉ.नरेंद्र आरेकर हे मार्गदर्शन करणार आहेत.
दुपारी 3 वाजता संविधान मुल्यांच्या प्रचार आणि प्रसारात माध्यमांची भूमिका या विषयावर पॅनेल चर्चा होणार आहे. त्यात दैनिक सकाळ नागपूरचे निवासी संपादक प्रमोद काळबांधे हे अध्यक्षस्थानी राहणार असून ज्येष्ठ पत्रकार रोहिदास राऊत, चंद्रपूरचे जिल्हा माहिती अधिकारी राजेश येसनकर, संजय रामगीरवार हे मार्गदर्शन करणार आहेत.
सायंकाळी बोधी फाऊंडेशनच्या वतीने आम्ही भारताचे लोक या सांस्कृतिक कार्यक्रमाचे सादरीकरण होणार आहे. त्यात गीते व नृत्यांच्या माध्यमातून संविधान तसेच राष्ट्रपुरुषांविषयक जाणीव जागृती करण्यात येणार आहे.
26 मार्च रोजी सकाळी 10 वाजता भारतीय संविधान आणि युवकांची जबाबदारी या विषयावर परिसंवाद होणार आहे. अविनाश पोईनकर हे अध्यक्षस्थानी राहणार असून प्रेम जोरपोतवार, तुषार दुधबावरे, तृप्ती भैसारे, अरबाज शेख हे आपली मते व्यक्त करणार आहेत. दुपारी 2 वाजता भारतीय संविधान आणि महिला या विषयावर परिसंवाद होणार आहे. यामध्ये ज्येष्ठ समाजसेविका ॲड.पारोमिता गोस्वामी या अध्यक्षस्थान भूषविणार आहेत, तर ज्येष्ठ समाजसेविका ॲड.पद्मा चांदेकर, ॲड.अंजली साळवे (विटनकर) व डॉ.प्रिया गेडाम आपले विचार व्यक्त करणार आहेत.
सायंकाळी 4 वाजता समारोपीय कार्यक्रमामध्ये संविधान जागर अभियानाचे समन्वयक स्वप्नील फुसे हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहणार आहेत.