नैसर्गिक आपत्तीमधील तीन मृतांच्या वारसांना 12 लाखांची मदत वितरित

अप्पर जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते वाटप

गडचिरोली : नैसर्गिक आपत्तीने वेगवेगळ्या घटनेत दगावलेल्या अहेरी व एटापल्ली उपविभागातील तीन मृतकांच्या वारसांना प्रत्येकी 4 लक्ष असे एकूण 12 लक्ष रुपये मदतीचे धनादेश सोमवारी (दि.22) त्यांच्या घरी जाऊन अप्पर जिल्हाधिकारी विजय भाकरे यांच्या हस्ते देण्यात आले.

या तीनही मृतांच्या अपघाताच्या घटना जुलै महिन्यातीलच आहेत. यात 9 जुलै रोजी तोडसा येथे पुराच्या पाण्यामध्ये वाहून गेलेल्या अमित डोलू तिम्मा यांचे वारस म्हणून वडील दोलू लुला तीम्मा यांना, 2 जुलै रोजी जीवनगट्टा येथील चंदू गिरमा पोरतेट हे वीज पडून मृत्यूमुखी पडले होते. त्यांचे वारस पत्नी प्रेमिला चंदू पोरतेट यांना, तसेच मौजा मरपल्ली येथील अंकुश पांडू कुळयेटी हे 8 जुलै 2024 रोजी मरपल्ली नाल्याजवळ पाण्यात पडून वाहून जाऊन मृत झाले. त्यांचे वारस आई सुमन पांडू कुळयेटी यांना त्यांच्या घरी जाऊन अप्पर जिल्हाधिकारी विजय भाकरे यांच्या उपस्थितीत शासकीय मदतीच्या रकमेचे धनादेश देण्यात आले.

यावेळी गटविकास अधिकारी आदित्य आंधळे, तालुका आरोग्य अधिकारी सचिन कन्नाके, एटापल्लीचे तलाठी पी.एन.उसेंडी, तोडसाचे पी.डी.आत्राम, कोतवाल देवाजी गावडे, सुरेश दुर्गे, सचिन गेडाम उपस्थित होते.