मुंबईतील टाटा मॅरेथॉन स्पर्धेमध्ये धावले गडचिरोलीचे युवक, पोलिसांचा पुढाकार

प्रोजेक्ट 'उडान' अंतर्गत मिळाली संधी

गडचिरोली : नक्षलदृष्ट्या अतिसंवेदनशिल असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात दुर्गम-अतिदुर्गम भागात राहणा­ऱ्या युवकांना विविध खेळांमध्ये प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यांच्या क्रीडाकौशल्याला वाव मिळण्यासाठी पोलिस विभागाच्या वतीने अनेक उपक्रम राबविण्यात येतात. ग्रामीण भागात कबड्डी, व्हॉलीबॉल स्पर्धांसह शहरात दरवर्षी मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन केले जाते. या मॅरेथॉन स्पर्धेच्या माध्यमातून युवक व युवतींना राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर नाव उंचविता यावे या उद्देशाने गडचिरोली जिल्हा पोलिस दलाच्या प्रोजेक्ट ‘उडान’अंतर्गत जिल्ह्रातील 20 युवक-युवती तथा 5 पोलिस अधिकारी तथा अंमलदारांनी रविवारी (दि.२१) मुंबई येथे झालेल्या टाटा मॅरेथॉनमध्ये सहभाग नोंदविला.

मुंबई येथे दरवर्षी टाटा मॅराथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात येत असते. या स्पर्धेमध्ये राज्यातीलच नव्हे तर परदेशातील खेळाडू सुद्धा मोठ्या प्रमाणात सहभागी होत असतात. सदर मॅराथॉन स्पर्धेकरीता गडचिरोली जिल्ह्यातील अतिदुर्गम भागातील युवकांना संधी देण्यासाठी पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांच्या संकल्पनेतून आणि अपर पोलिस अधीक्षक (प्रशासन) कुमार चिंता यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाभरातील 61 पोस्टे, मदत केंद्रांतर्गत युवकांची निवड चाचणी घेण्यात आली. त्यातून 20 युवक-युवतींची निवड केली. याशिवाय 5 पोलिस अधिकारी-अंमलदारांचीही यासाठी निवड करण्यात आली. त्यांना गडचिरोली पोलिस दलातर्फे मॅरेथॉनसाठी लागणारे सर्व साहित्य वाटप करून राष्ट्रीय स्तरावरील तज्ज्ञ प्रशिक्षकांकडून सरावाचे नियोजन करत दोन महिन्यांचे निवासी प्रशिक्षण पोलिस मुख्यालयात दिले.

या प्रशिक्षणादरम्यान युवक-युवतींचा त्यांची शारीरिक क्षमता वाढविण्याकरीता कसून सराव घेण्यात आला. यामध्ये 21 किमी, 25 किमी, 35 किमी आणि 42 किमी धावणे, स्ट्रेन्थनिंग एक्सरसाईज, एबीसी एक्सरसाईज, हिल एक्सरसाईज इ. शारीरिक कवायतींचा समावेश होता. या प्रशिक्षणादरम्यान युवक-युवतींना वेळोवेळी पोलिस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) कुमार चिंता यांनी मार्गदर्शन केले.

यांनी घेतला मॅरेथॅानमध्ये सहभाग

सदर टाटा मुंबई मॅरेथॉन स्पर्धेमध्ये 42 किमी गटात पोलिस निरीक्षक कुंदन गावडे, परिविक्षाधिन पो.उपनिरीक्षक धनराज कोळी, श्यामरंग गवळी, मयुर पवळ, तसेच जय नलेश्वर नंदनवार, टिंकू चंद्रभान चलाख, रोहन संजय भुरसे, अमोल रविंद्र पोरटे, सुमीत दिगांबर चौधरी, सागर नानाजी दुर्गे, विशाल सत्यवान रामटेके, तुषाल शंकर गावतुरे, संपतराव लच्चा ईष्टाम, यश राजु भांडेकर, दिनेश व्यंकटी मडावी, अमित विश्वनाथ कावडे, योगेश जंतुराम चनाप, सुरज लुल्ला तिम्मा, अभिषेक सुरेश कुमरे, पियुष सोनुले, सौरभ कन्नाके, तसेच प्रकाश रमेश मिरी (42 किमी अंतर 2 तास, 54 मिनिटात), सुरज साईनाथ बोटरे (42 किमी अंतर 2 तास, 54 मिनिटात) आणि 21 किमी गटात नायक शांताराम सपकाळ व प्रियंका लालसु ओकसा (21 किमी अंतर 1 तास, 37 मिनिटात) यांनी सहभाग नोंदविला.

या स्पर्धेत गडचिरोलीच्या युवकांनी सहभागी व्हावे यासाठी वरिष्ठांच्या मार्गदर्शनात अपर पोलिस अधीक्षक (अभियान) यतिश देशमुख, अपर पोलिस अधीक्षक (अहेरी) एम. रमेश यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व उपविभागीय अधिकारी, सर्व ठाण्यांचे प्रभारी अधिकारी तसेच नागरी कृती शाखेचे प्रभारी अधिकारी पो.उपनिरीक्षक धनंजय पाटील, भारत निकाळजे, चंद्रकांत शेळके, अंमलदार तसेच प्रशिक्षक सहायक उपनिरीक्षक जांगी, नायक पवार यांनी मोठे परिश्रम घेतले.