शेवटच्या घटकापर्यंत आरोग्य सेवा पुरविण्याचा प्रयत्न : ना.धर्मरावबाबा आत्राम

एटापल्ली येथे झाले महाआरोग्य शिबिर

एटापल्ली : प्रत्येक नागरिकाचे आरोग्य चांगले राहावे आणि त्यांना वेळेवर उपचार मिळावेत, या उद्देशाने ‘संकल्प निरोगी महाराष्ट्राचा’ हे ब्रीदवाक्य घेऊन समाजातील प्रत्येक घटकातील नागरिकांना आरोग्यसेवा पुरविण्यात येणार असल्याचे प्रतिपादन अन्न व औषध प्रशासनमंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी केले.

एटापल्ली येथील तालुका मुख्यालयात राष्ट्रीय आरोग्य अभियान व ग्रामीण रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमानाने आदिवासी भागातील रुग्णांना विशेष तज्ज्ञांच्या आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी ‘महाभव्य नि:शुल्क आरोग्य व दंत चिकित्सा’ शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सिनेट सदस्य तनुश्री आत्राम, एटापल्लीच्या नगराध्यक्ष दीपयंती पेंदाम, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रवींद्र वासेकर, माजी जि.प. सभापती नाना नाकाडे, माजी पं.स. सभापती बेबीताई नरोटे, तहसीलदार हेमंत गांगुर्डे, उपविभागीय पोलीस अधिकारी चैतन्य कदम, संवर्ग विकास अधिकारी आदिनाथ आंधळे, बालविकास अधिकारी विद्याधर बुरीवारे, वैद्यकीय अधीक्षक डॉ.तुपेश उईके, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.सचिन कन्नाके आदी उपस्थित होते.

संजय चरडुके झाले राष्ट्रवादीवासी

गडचिरोली जिल्हा परिषदेचे माजी सदस्य संजय चरडुके यांनी अनेक कार्यकर्त्यांसह राज्याचे अन्न व औषध प्रशासनमंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्या अध्यक्षतेखाली अखेर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीरपणे प्रवेश केला. शुक्रवारी (दि.१६) एटापल्लीतील जिल्हा परिषद शाळेच्या पटांगणात हा पक्ष प्रवेश कार्यक्रम झाला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सिनेट सदस्य तनुश्री आत्राम, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रवींद्र वासेकर, माजी जि.प. सदस्य नाना नाकाडे, राकॉचे एटापल्ली तालुका अध्यक्ष श्रीकांत कोकुलवार, बेबी नरोटे, माजी ज्ञानकुमारी कौशी, राकॉचे कार्याध्यक्ष संभाजी हिचामी, नगरसेवक जितेंद्र टिकले, लक्ष्मण नरोटी, राजू नरोटी, अभि नागुलवार, तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मागील अनेक दिवसांपासून संजय चरडुके हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटेवर असल्याची चर्चा होती. अखेर शुक्रवारी त्यांनी जाहीर प्रवेश करत या चर्चांना पूर्णविराम दिला. त्यांच्यासोबत एटापल्लीचे माजी पंचायत समिती सभापती जनार्धन नल्लावार, तसेच सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य आणि अनेक कार्यकर्त्यांनी जाहीर प्रवेश घेतला. यावेळी मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी पक्षाचा दुपट्टा गळ्यात टाकून आणि पुष्पगुच्छ देऊन त्या सर्वांचे स्वागत केले.

दरम्यान एटापल्ली तालुक्यात आगमन होताच ना.धर्मरावबाबा यांचे ढोल-ताशांच्या गजरात, रेला नृत्य आणि आतषबाजी करत जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी एटापल्ली तालुक्यातील विविध भागातून हजारो नागरिक उपस्थित होते.

धर्मरावबाबांच्या नेतृत्वावर विश्वास- चरडुके

आदिवासी विद्यार्थी संघटनेत फूट पडली असून अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. शिवाय दोन नेते दोन बाजूला गेले आहेत. आपल्या भागाचा विकास करायचा असेल तर विकासाचा दृष्टिकोन असलेल्या नेत्यासोबत राहणे आवश्यक आहे. त्यामुळे धर्मरावबाबा यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून त्यांच्या छत्रछायेत काम करण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे त्यांनी आपल्या भाषणात स्पष्ट केले.