चामोर्शी : तालुक्यातील जय शिवराय क्रीडा मंडळ, वाकडी (नवीन) यांच्या वतीने मामा तलाव परिसरात मोठ्या स्वरूपात दिवस-रात्र वजन गटनिहाय कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ग्रामीण भागातील क्रीडाप्रेमींमध्ये उत्साह निर्माण करणाऱ्या या स्पर्धेचे उद्घाटन भाजप अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री तथा मा.खा.अशोक नेते यांच्या हस्ते करण्यात आले.
या कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून झाली. त्यानंतर मा.खा.अशोक नेते यांनी फित कापून स्पर्धेचे उद्घाटन केले.
याप्रसंगी मार्गदर्शन करताना अशोक नेते म्हणाले, कबड्डी हा सांघिक खेळ असून, तो युवकांमध्ये एकजुटता आणि शारीरिक सुदृढता वाढवतो. तरुणांनी अशा मैदानी खेळांमध्ये उस्फूर्त सहभाग घ्यावा. खेळासोबत शारीरिक आरोग्याला प्राधान्य द्या आणि शिक्षणाकडेही लक्ष द्या. कबड्डी हा खेळ ग्रामीण भागात आत्मसन्मानाचे प्रतीक आहे. अशा प्रकारच्या स्पर्धांमुळे युवकांना खेळाविषयी आवड निर्माण होते आणि करिअर घडवण्याची प्रेरणा मिळते, असे ते म्हणाले. त्यांनी गावातील समस्या दूर करण्यासाठी सकारात्मक राहून पायाभूत सुविधांसाठी प्रयत्न करण्यात येतील, असे आश्वासन दिले.
यावेळी मंचावर प्रामुख्याने भाजपचे जिल्हा महामंत्री प्रकाश गेडाम, सहकार आघाडीचे जिल्हाध्यक्ष तथा नगरसेवक आशिष पिपरे, अमोल मंगर, प्रकाश मेश्राम, शिक्षकवृंद कुडवे, दुधे, सोरते, तसेच मंडळाचे अध्यक्ष वैभव सोमनकर, सुरेश बारसागडे, विमला मडावी आदी प्रामुख्याने उपस्थित होते. याशिवाय गावातील नागरिक व कार्यकर्तेही मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.