जिल्ह्यातील 50 आदिवासी युवक आठवडाभरासाठी बंगळुरूला रवाना

नैसर्गिक संपन्नतेची ओळख मांडा- जिल्हाधिकारी

गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्याला नैसर्गिक व सांस्कृतिक संपन्नतेचा वारसा लाभला आहे. प्रदुषणमुक्त, आदिवासी संस्कृती जतन करणारा, शुद्ध हवा, शुद्ध पाणी असलेला, सर्वाधिक जास्त खनिजांचा जिल्हा व महाराष्ट्राचे फुफ्फुस म्हणून ओळखला जाणारा जिल्हा अशी सकारात्मक ओळख आपण अभिमानाने जगासमोर मांडा, असे आवाहन जिल्हाधिकारी संजय दैने यांनी आठवडाभरासाठी बंगळुरूला जाणाऱ्या युवकांच्या चमूला केले.

नेहरू युवा केंद्रांतर्गत युवा कार्यक्रम, खेळ मंत्रालय तथा केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील 50 आदिवासी युवकांची तुकडी शुक्रवारी बंगळुरू(बँगलोर) येथे 1 ते 7 डिसेंबरदरम्यान होणाऱ्या आदिवासी युवा आदान-प्रदान कार्यक्रमासाठी रवाना करण्यात आली. त्यानिमित्त आयोजित प्रस्थान कार्यक्रमांमध्ये जिल्हाधिकारी संजय दैने मार्गदर्शन करीत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सीआरपीएफचे उपमहानिरीक्षक अजयकुमार शर्मा उपस्थित होते.

उपमहानिरीक्षक शर्मा यांनी यावेळी युवकांशी संवाद साधताना या कार्यक्रमाच्या माध्यमातून बाह्यजगाची माहिती मिळवावी, इतर राज्यातील आदिवासी संस्कृती, कला आणि इतर सामाजिक गोष्टीची माहिती प्राप्त करून त्यातून आपला सामाजिक विकास साधण्याचा प्रयत्न करण्याचे आवाहन केले. तसेच आपण गडचिरोलीच नाही तर महाराष्ट्राचे नेतृत्व करत आहात. त्यामुळे या संधीचा लाभ घेऊन आपल्या जिल्ह्याचे नाव उंचवण्याचे आवाहन त्यांनी केले.

या कार्यक्रमाला डेप्युटी कमांडंट सुमित वर्मा, डेप्युटी कमांडंट नितीन कुमार उपस्थित होते. प्रास्ताविक जिल्हा युवा अधिकारी अमित पुंडे यांनी केले तर उपस्थितांचे आभार केंद्रीय राखीव पोलीस दलाचे पांडे यांनी मानले.

नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी, भामरागड आणि एटापल्ली तालुक्यातील एकूण 50 युवकांचा या तुकडीत समावेश आहे. वर्ष 2024-25 या वर्षात गडचिरोली जिल्ह्यातील एकूण 450 आदिवासी युवकांना पोलीस महानिरीक्षक¸ पश्चिम विभाग केंद्रीय राखीव पोलीस दल नवी मुंबई, केंद्रीय राखीव पोलीस दल गडचिरोली आणि नेहरू युवा केंद्र गडचिरोली यांच्याकडून देशातील विविध 9 ऐतिहासिक शहरांमध्ये पाठवले जाणार आहे. आदिवासी तरुणांना भारताच्या समृद्ध, सांस्कृतिक वारशाची जाणीव करून देणे आणि त्यांना विविधतेतील एकतेची संकल्पना आत्मसात करणे, त्यांना विकासात्मक उपक्रम आणि औद्योगिक प्रगतीची जाणीव करून देणे आणि आदिवासी तरुणांना इतर क्षेत्रात येण्यासाठी प्रवृत्त करणे हा यामागील उद्देश आहे.

कार्यक्रमाच्या प्रमुख उपक्रमांमध्ये घटनात्मक अधिकारी, मान्यवर आणि प्रतिष्ठित व्यक्तींसोबत संवाद सत्रे, पॅनल चर्चा, व्याख्यान सत्र, आझादी का अमृत महोत्सवअंतर्गत उपक्रम, वक्तृत्व स्पर्धा, कौशल्य विकास, करिअर मार्गदर्शनाशी संबंधित उद्योग भेटी, महत्त्वाच्या आणि ऐतिहासिक स्थळांच्या भेटींचा समावेश आहे.