गडचिरोली : जिल्ह्यातील शेतकरी उत्पादक कंपन्यांना मार्गदर्शन, माहिती आणि त्यांच्या सक्षमीकरणाच्या उद्देशाने आत्मा प्रकल्पातर्फे विशेष कार्यशाळेचे आयोजन दिनांक 12 जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात करण्यात आले आहे. (सविस्तर बातमी खाली वाचा)
ही कार्यशाळा सकाळी 11 वाजता सुरू होणार आहे. यात विविध विषयांवरील सत्रांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यशाळेत शेतकरी, कृषी उद्योजक तसेच उत्पादन कंपन्यांचे प्रतिनिधी सहभागी होणार असून कृषी, महसूल, उद्योग, वन, खते व जैविक उत्पादन यासारख्या विविध क्षेत्रांतील तज्ज्ञांचे सखोल मार्गदर्शन लाभणार आहे. (अधिक बातमी खाली वाचा)

यावेळी आत्माच्या संचालक प्रीती हिरळकर, अपर जिल्हाधिकारी नितीन गावंडे, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक निलेश गायकवाड आणि जिल्हा सहकारी बँकेचे व्यवस्थापक प्रशांत धोंगळे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
या कार्यशाळेत भाडेपट्टी करार, वनजमिनीवरील उद्योग उभारणीसाठी लागणाऱ्या परवानग्या, कृषक जमिनीवर प्रक्रिया उद्योग उभारताना आवश्यक कागदपत्रे, प्रधानमंत्री खनिज क्षेत्र कल्याण योजनेअंतर्गत उत्पादनवाढ व कृषी अवजारे या विषयावरील माहिती, उत्पादक कंपन्यांना आवश्यक परवाने, कंपनी स्थापनेपासून मूल्यसाखळी तयार करण्याच्या संधी, भाजीपाला लागवड व त्याचे शाश्वत व्यवस्थापन, नैसर्गिक शेती, पॅकेजिंग, जैविक निविष्ठा, सेंद्रिय मानांकन, बीआरसी उभारणी या विषयांवर तज्ञांद्वारे सखोल मार्गदर्शन केले जाणार आहे.
शेतकरी आणि उत्पादक कंपन्यांना उद्योजकीय क्षेत्रात उभे राहण्यासाठी ही कार्यशाळा दिशादर्शक ठरणार असून शेतकऱ्यांनी या कार्यशाळेत मोठ्या संख्येने लाभ घ्यावा,असे आवाहन आत्माच्या संचालक प्रीती हिरळकर यांनी केले आहे.