गडचिरोली : ‘सरकारची आणि मुख्यमंत्र्यांची नजर या जिल्ह्यातल्या लोहखाणींवर आहे. गडचिरोलीचा वेगळा तुकडा पाडायचा त्यांचा प्रयत्न आहे. फडणविसांना गडचिरोलीचा ‘फडणविस्तान’ करायचा आहे, जिथे ‘हम करे सो कायदा’ असेल. कोणाला विरोधात बोलण्याची किंवा वागण्याची सोय नसेल. ज्याप्रमाणे मुंबईतून मराठी माणूस हद्दपार होत आहे, त्याप्रमाणे गडचिरोलीतून एक दिवस मूळ लोक हद्दपार होतील,’ असा इशारा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिला. गडचिरोलीत काँग्रेसच्या वतीने आयोजित शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते.
शेतकरी मेळावा आणि शेतकरी न्याय यात्रेच्या निमित्ताने गुरूवारी (दि.12) प्रदेशाध्यक्ष सपकाळ आणि काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार गडचिरोलीत होते. यावेळी दोन्ही नेत्यांनी सरकारवर जोरदार प्रहार केले. (अधिक बातमी खाली वाचा)

पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री फडणवीस जे बोलतात ते कधीच करत नाहीत. स्वतःला फकीर म्हणवणारे नरेंद्र मोदी लाखो रुपये किमतीची जॅकेट्स, लाखो रुपयांचे कपडे वापरतात, ते योगी नाही तर सत्ताभोगी आहेत, असा घणाघात प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांनी केला.
यावेळी विजय वडेट्टीवार यांनी आपल्या भाषणात सरकारने खोटी आश्वासने देत सत्ता बळकावल्याचे म्हटले. येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहे म्हणून लाडक्या बहिणींना हे 1500 रुपये मिळत आहेत. त्यानंतर त्यांचा माणूस योजना परवडणारी नाही असे म्हणत कोर्टात याचिका दाखल करेल. नंतर कोर्टाच्या आदेशाने ही योजनाही बंद करायला लावेल, अशी शंका त्यांनी उपस्थित केली. येणाऱ्या निवडणुकीत त्यांची नस दाबली नाही तर 1500 रुपयेसुद्धा जातील, असा इशारा वडेट्टीवार यांनी दिला.
यावेळी खासदार नामदेव किरसान, खा.प्रतिभा धानोरकर, अखिल भारतीय काँग्रेसचे सचिव कुणाल चौधरी, आ.रामदास मसराम, आ.अभिजीत वंजारी, माजी मंत्री अनिस अहमद, माजी आमदार सुभाष धोटे, निरीक्षक सचिन नाईक, जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे, प्रदेश सचिव पंकज गुड्डेवार, रवींद्र दरेकर, युवक काँग्रेस प्रदेश सचिव विश्वजित कोवासे, प्रकाश इटनकर, माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडलावार, माजी जि.प.उपाध्यक्ष मनोहर पोरेटी, सतीश वारजूरकर, शहर अध्यक्ष सतीश विधाते, महिला अध्यक्ष कविता मोहरकर, सर्व तालुकाध्यक्ष, सर्व सेलचे अध्यक्ष, शेतकरी, महिला, युवक यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अभिनव लॅानवरील शेतकरी मेळाव्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत पदयात्रा काढण्यात आली. त्या ठिकाणी अपर जिल्हाधिकाऱ्यांनी शिष्टमंडळाचे निवेदन स्वीकारले.