पंतप्रधानांच्या धोरणे आणि कृतीत सर्वांचे कल्याण दिसते

मा.आ.कृष्णा गजबे यांचे प्रतिपादन

देसाईगंज : मोदी सरकारच्या गेल्या 11 वर्षांच्या कार्यकाळात भारताने सर्वांगिन आणि समावेशक विकासाची नवीन उंची गाठली आहे. मग ती गरीब, शेतकरी, महिला यांच्या उन्नतीसाठी कल्याणकारी योजना असोत, किंवा आर्थिक विकासाला गती देण्यासाठी पायाभूत सुविधा असोत. एवढेच नाही तर वैज्ञानिक संशोधनालाही चालना दिली. प्रत्येक क्षेत्रात जोरदार काम झाले. पंतप्रधानांच्या धोरणे आणि कृतीतून सर्वांचे कल्याण झाले, असे प्रतिपादन माजी आमदार कृष्णा गजबे यांनी केले.

देसाईगंज येथील सिंधू भवनात आयोजित विकसित भारत संकल्प सभेत मुख्य मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. यावेळी गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार डॅा.नामदेव उसेंडी, लोकसभा निवडणूक प्रमुख तथा भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष किशन नागदेवे, किसान मोर्चाचे प्रदेश सदस्य रमेश भुरसे, जिल्हा सचिव डॅा.भारत खटी, जिल्हा उपाध्यक्ष मोतीलाल कुकरेजा, महिला जिल्हा उपाध्यक्ष शालू दंडवते आणि देसाईगंज तालुक्यातील भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली आम्ही जगातील सर्वात मोठा आर्थिक समावेशन कार्यक्रम “जन धन योजना” आणि आरोग्य क्षेत्रासाठी आयुष्मान भारत योजना सुरू करून ती जनतेपर्यंत यशस्वीरित्या पोहोचवण्यात आली. गेल्या 11 वर्षात, पंतप्रधानांनी त्यांच्या धोरणांद्वारे आणि कृतींद्वारे स्पष्ट संदेश दिला आहे की त्यांच्यासाठी भारताचे आणि भारतीयांचे कल्याण सर्वात महत्त्वाचे आहे, असे कृष्णा गजबे यावेळी म्हणाले.

यावेळी देसाईगंज तालुक्यातील कुरुड ग्रामपंचायतीच्या नवनियुक्त सरपंच प्रीती मडावी यांचा प्रमुख अतिथींच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक शहराध्यक्ष सचिन खरकाटे यांनी तर संचालन तालुका अध्यक्ष सुनील पारधी यांनी केले. आभार चैतनदास विधाते यांनी मानले. यावेळी भाजपचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.