गडचिरोली : खासदार डॉ.नामदेव किरसान यांनी गडचिरोली नगर परिषद कार्यालयात आढावा बैठक घेऊन नगरपरिषद क्षेत्रातील विविध विकासकामे, नागरी समस्या आणि नागरिकांच्या मूलभूत गरजांवर सविस्तर चर्चा केली. या बैठकीत शहरातील दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या समस्यांची माहिती घेत त्यावर तत्काळ उपाययोजना करण्याचे निर्देश त्यांनी दिले.
या बैठकीला नगर परिषदेचे मुख्याधिकारी सूर्यकांत पिदूरकर, जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे, युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव विश्वजीत कोवासे, काँग्रेस शहराध्यक्ष व माजी नगरसेवक सतीश विधाते, माजी नगराध्यक्ष राजेश कात्रटवार, काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष समशेरखाँ पठाण, गडचिरोली तालुकाध्यक्ष वसंत राऊत, माजी नगरसेवक रमेश चौधरी, माजी नगरसेवक नंदू कायरकर, माजी नगरसेवक सुनील डोंगरा, माजी नगरसेवक गुलाब मडावी, प्रभाकर वासेकर, रजनीकांत मोटघरे, नितेश राठोड, रुपेश टिकले, सुरेश भांडेकर, संजय मेश्राम, रामकृष्ण ताजने, समीर ताजने, माजित सय्यद, गौरव येनप्रेड्डीवार, जावेद खान, कुणाल ताजने, लता मुरकुटे, कल्पना नंदेश्वर, रिता गोवर्धन यांच्यासह इतर पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.

अनेक वर्षांपासून अतिक्रमण करून वास्तव्य करणाऱ्या गरीब व गरजू कुटुंबांना घरकुल योजनेचा लाभ मिळावा यासाठी त्यांना कायमस्वरूपी पट्टे वितरित करण्याची कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी झाली. शहरातील प्रत्येक नागरिकाला पिण्याचे शुद्ध पाणी मिळावे, यासाठी पाणीपुरवठा व्यवस्था बळकट करण्यावर चर्चा झाली.
तसेच शहरात स्वच्छता राखणे, नियमित नालीसफाई करणे, कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन करणे आणि मंजूर विकासकामांमध्ये गुणवत्ता राखणे या बाबींवर भर देण्याचे निर्देश खासदार डॉ.किरसान यांनी दिले. शहराचे सौंदर्यीकरण आणि नागरी सुविधा सुधारण्यासाठी प्रशासनाने तत्परतेने कार्यवाही करावी, असे ते म्हणाले.
या बैठकीत नागरिकांनी त्यांच्या अडचणी, सूचना आणि अपेक्षा मांडल्या. त्या सर्वांना गांभीर्याने घेत, संबंधित अधिकाऱ्यांना वेळेत आणि प्रभावी निर्णय घेण्याचे निर्देश देण्यात आले.