‘आणीबाणी : काळा दिवस’ विषयावर परिसंवाद व चर्चासत्र

भाजपतर्फे कुरखेडात आयोजन

कुरखेडा : भारताच्या इतिहासातील ‘काळा दिवस’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आणीबाणीला 50 वर्ष झाल्याच्या निमित्ताने भारतीय जनता पार्टी, तालुका कुरखेडा यांच्या वतीने ‘आणीबाणी- एक काळा दिवस’ या विषयावर बुधवारी (दि.25) परिसंवाद आणि चर्चासत्राचे आयोजित केले होते. माजी आमदार कृष्णा गजबे यांच्या कुरखेडा येथील जनसंपर्क कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा.आ.कृष्णा गजबे होते.

यावेळी बोलताना कृष्णा गजबे यांनी लोकशाहीच्या रक्षणासाठी सदैव जागरूक राहण्याचे आवाहन केले. आजपासून 50 वर्षांपूर्वी, म्हणजे 25 जून 1975 रोजी भारतावर आणीबाणी लादण्यात आली होती. हा केवळ एक राजकीय निर्णय नव्हता, तर कोट्यवधी भारतीयांच्या मूलभूत स्वातंत्र्यावर आणि हक्कांवर केलेला तो एक थेट हल्ला होता, असे ते म्हणाले. (अधिक बातमी खाली वाचा)

आणीबाणीच्या काळातील परिस्थितीचे वर्णन करताना ते म्हणाले, “भाषण स्वातंत्र्य हिरावून घेण्यात आले, वृत्तपत्रांवर सेन्सॉरशिप लादली गेली आणि विरोधी पक्षांच्या नेत्यांना व कार्यकर्त्यांना मोठ्या संख्येने तुरुंगात टाकण्यात आले. यामुळे लोकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

मा.आ.गजबे यांनी या काळातील लोकशाहीच्या लढ्याला उजाळा दिला. ते म्हणाले, आणीबाणीच्या या काळ्या पर्वात, अनेक शूर स्वातंत्र्यसेनानींनी आणि लोकशाहीप्रेमींनी तीव्र विरोध केला. त्यांनी तुरुंगवास भोगला, अमानुष छळ सहन केला आणि काहींनी तर लोकशाहीच्या रक्षणासाठी आपले प्राणही गमावले. जयप्रकाश नारायण, अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी, जॉर्ज फर्नांडिस यांसारख्या अनेक नेत्यांनी या अन्यायाविरुद्ध आवाज उचलला होता. त्यांचे धैर्य आणि त्याग आपल्यासाठी नेहमीच प्रेरणादायी राहील, असे गजबे म्हणाले.

भविष्यात कधीही अशा प्रकारे लोकशाहीवर गदा येणार नाही यासाठी आपण सदैव जागरूक राहू. आपल्या संविधानाने आपल्याला दिलेले अधिकार आणि स्वातंत्र्य यांचे आपण नेहमीच जतन करू. लोकशाही ही केवळ एक शासनाची पद्धत नाही, तर ती एक जीवनशैली आहे. ती आपल्याला विचार करण्याचे, बोलण्याचे आणि आपल्या मतानुसार जगण्याचे स्वातंत्र्य देते, अशा शब्दात मा.आ.गजबे यांनी आपल्या भाषणाचा समारोप केला. त्यांनी लोकशाहीच्या रक्षणासाठी बलिदान दिलेल्या सर्व ज्ञात-अज्ञात विरांना आदराने स्मरण केले आणि त्यांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही, असे सांगितले.

या कार्यक्रमाला भाजपचे तालुकाध्यक्ष चांगदेव फाये, भाजपचे जिल्हा सचिव गणपत सोनकुसरे, ओबीसी आघाडीचे जिल्हा महामंत्री रवींद्र गोटेफोडे, नगरसेवक सागर निरंकारी, माजी सैनिक नामदेवराव बनपुरकर, भाजपचे जेष्ठ कार्यकर्ते रोहिदास मिरी, कृष्णा चंद्रमा, नगरसेविका अल्का गिरडकर, नगरसेविका दुर्गा गोटेफोडे, रजनीगंधा बनसोड, जयश्री मडावी, रूपाली कावळे, शितल लांजेवार, कविता खडसे , चित्रा गजभिये, अंग्ररेज कराडे, विनोद नागपूरकर, राकेश खुणे, भाग्यवान जनबंधू, उल्हास देशमुख, राहुल गिडकर, बंटी देवढगले , ज्ञानेश्वर शेडमाके व कुरखेडा तालुक्यातील भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येत उपस्थित होते.

प्रास्ताविक कार्यक्रम संयोजक रवींद्र गोटेफोडे यांनी केले तर संचालन प्रा.विनोद नागपूरकर यांनी केले. आभार जयश्री मडावी यांनी मानले. यावेळेस भारतीय जनता पक्षाचे तालुका पदाधिकारी, जिल्हा पदाधिकारी व भाजपा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.