गडचिरोली : जिल्ह्यातील पाच पैकी तीन वनविभागांचे प्रमुख, अर्थात उपवनसंरक्षकांची बदली झाली आहे. त्यात गडचिरोलीचे उपवनसंरक्षक मिलीश दत्त शर्मा यांची सावंतवाडीचे (जि.कोल्हापूर) उपवनसंरक्षक (प्रादेशिक) म्हणून, तर आलापल्लीचे राहुलसिंह तोलिया यांची आकोट (जि.अकोला) येथे उपवनसंरक्षक (वन्यजीव) पदावर बदली झाली आहे.
याशिवाय सिरोंचा वनविभागाच्या बहुचर्चित उपवनसंरक्षक पुनम पाटे यांची महाराष्ट्र जनुक कोष (विशेष कक्ष) जैवविविधता मंडळ, नागपूर येथे बदली करण्यात आली. त्या जनसुविधेचा विचार न करता हेकेखोरपणे वागत असल्याची तक्रार झाली होती. त्यामुळेच त्यांना साईड पोस्ट देण्यात आल्याचे बोलले जाते. (अधिक बातमी खाली वाचा)

विशेष म्हणजे जिल्ह्यात पहिल्यांदाच एकावेळी दोन उपवनसंरक्षक दर्जाच्या महिला अधिकाऱ्यांना पाठविण्यात आले आहे. त्यात आर्या व्ही.एस. यांची गडचिरोलीच्या उपवनसंरक्षक (प्रादेशिक) म्हणून, तर दीपाली लक्ष्मण वनकर (तलमले) यांची उपवनसंरक्षक (प्रादेशिक) आलापल्ली म्हणून बदली झाली आहे. तसेच एस.नवकिशोर रेड्डी यांची उपवनसंरक्षक (प्रादेशिक) सिरोंचा या पदावर बदली झाली आहे.