पाण्यात अडकलेल्या दोन बस सुखरूप काढल्या बाहेर

गावातच करावा लागला मुक्काम

गडचिरोली : मुसळधार पावसामुळे गडचिरोली ते नागपूर महामार्गावरील पाण्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी अडकून पडलेल्या दोन बसगाड्यांना प्रशासनाने तातडीने हालचाली करत सुखरूप बाहेर काढले. त्यात एक खासगी तर दुसरी एसटी महामंडळाची बस होती. पाण्यातून जाताना दोन्ही बसचे इंजिन पाण्यामुळे बंद पडल्याने त्या बसेस जागेवरच थांबल्या होत्या. जिल्हा प्रशासनाने जेसीबी आणि आपत्ती व्यवस्थापनाच्या चमुच्या मदतीने दोन्ही बस बाहेर काढल्या. त्यातील सर्व प्रवाशांनाही सुखरूप बाहेर काढण्यात आले.

गडचिरोली – आरमोरी मार्गावरील ठाणेगाव येथे एक खाजगी बस पाण्यात खोलवर अडकली होती. या बसमध्ये सुमारे 50 प्रवासी होते. सभोवताल पाणी आणि मध्ये बस अडकून पडल्याने आतील प्रवाशांचा जीव टांगणीला लागला होता. या घटनेची माहिती मिळताच जिल्हा प्रशासनाने तत्काळ जेसीबी व हायवा घटनास्थळी पाठवून बचावकार्य सुरू केले. आपत्ती व्यवस्थापनाच्या टीमच्या मदतीने ही बस बाहेर काढण्यात आली.

दुसऱ्या घटनेत गडचिरोली – नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील गाढवी नदीजवळ पुलाच्या अलीकडे एस.टी.महामंडळाची एक बस देखील इंजिनमध्ये पाणी गेल्याने बंद पडून अडकली होती. या बसमध्ये 23 प्रवासी होते. येथेही प्रशासनाने त्वरित जेसीबी पाठवून बसला बाहेर काढले.

या दोन्ही घटनांमध्ये प्रवाशांना कोणतीही इजा झालेली नसून, प्रशासनाने तात्काळ हस्तक्षेप करत दोन्ही बस सुरक्षित बाहेर काढल्याने प्रवाशांचा जीव भांड्यात पडला. त्या प्रवाशांना जिल्हा प्रशासनातर्फे तात्पुरत्या निवासाची आणि जेवणाची व्यवस्था संबंधित ग्रामपंचायतीमार्फत करण्यात आली आहे. आरमोरीच्या तहसीलदार उषा चौधरी तसेच पोलीस निरीक्षक कैलास गवते यांच्या उपस्थितीत दोन्ही बसचे बचाव कार्य पार पाडण्यात आले.

जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी जिल्ह्यातील पाण्याचा प्रवाह असलेल्या सर्व रस्त्यांवर कोणतीही वाहनं पाण्यातून जाऊ नयेत यासाठी पोलिस प्रशासनाला तातडीने बॅरिकेटिंग लावण्याच्या सूचना दिल्या आहेत. पावसाळी हवामानात नागरिकांनी योग्य खबरदारी घेऊन प्रवास करावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे.