Home पब्लिक प्रॉब्लेम स्मार्ट मीटरची सक्ती रद्द करा, चामोर्शीत काँग्रेसचा धडक मोर्चा

स्मार्ट मीटरची सक्ती रद्द करा, चामोर्शीत काँग्रेसचा धडक मोर्चा

महावितरण कार्यालयावर निदर्शने

चामोर्शी : स्मार्ट मीटरची सक्ती तात्काळ रद्द करावी, वाढती वीज बिले कमी करावीत आणि सर्वसामान्य ग्राहकांवरील अन्याय थांबवावा, या प्रमुख मागण्यांसाठी चामोर्शी येथील महावितरण कार्यालयावर जिल्हा काँग्रेस कमिटी, तालुका युवक काँग्रेस, शहर युवक काँग्रेस व एनएसयुआय यांच्या संयुक्त विद्यमाने धडक मोर्चा काढण्यात आला. यावेळी जोरदार निदर्शने करून सहाय्यक अभियंत्यांना विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.

मोर्चादरम्यान काँग्रेस कार्यकर्त्यांनी स्मार्ट मीटरच्या सक्तीविरोधात, तसेच वाढत्या वीज बिलांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. नागरिकांवर जबरदस्तीने स्मार्ट मीटर लादण्याचा शासनाचा निर्णय तात्काळ मागे घ्यावा, अन्यथा काँग्रेस पक्ष जनतेसोबत लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन उभारेल, असा इशारा जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष ॲड.विश्वजीत कोवासे यांनी दिला.

यावेळी माजी जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे, माजी जि.प.उपाध्यक्ष मनोहर पाटील पोरेटी, तालुकाध्यक्ष प्रमोद भगत, जिल्हा उपाध्यक्ष निकेश गद्देवार, उपनगराध्यक्ष लोमेश बुरांडे, पर्यावरण सेलचे जिल्हाध्यक्ष राजेश ठाकूर, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नितेश राठोड, तालुकाध्यक्ष वसंत राऊत, एनएसयुआयचे जिल्हाध्यक्ष राहुल वैरागडे, तालुकाध्यक्ष प्रेमानंद गोंगले, शहराध्यक्ष विलास चिचघरे, विजय लाड, प्रेमानंद कोवासे, ज्येष्ठ नेते हरबाजी मोरे, अमर मोगरे, तेजस कोंडेकर, सुभाष कोठारे, आचल चलकलवार, ओमप्रकाश चौधरी, नेहा आभारे, संजय बुरांडे, पीपलदास सोयाम, जावेद खान तसेच मोठ्या संख्येने शेतकरी, शेतमजूर आणि सर्वसामान्य नागरिक उपस्थित होते.

सरकारने जनतेच्या हिताचा विचार करून स्मार्ट मीटरची सक्ती तात्काळ रद्द करावी व वीज ग्राहकांच्या समस्या त्वरित सोडवाव्यात, असे निवेदन उपकार्यकारी अभियंता देवगडे यांच्या सुपूर्त करण्यात आले. या सर्व मागण्या वरिष्ठ स्तरावर पाठवून त्यात लवकरात लवकर सोडविण्यात येतील, असे आश्वासन उपकार्यकारी अभियंता देवगडे यांनी दिले.