गडचिरोली : लगाम ते आलापल्ली या राष्ट्रीय महामार्गाचे काम गेल्या काही महिन्यांपासून अत्यंत संथगतीने सुरू असल्याने या परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. अपूर्ण बांधकाम, खराब रस्ते आणि खड्ड्यांमुळे होणारे अपघात आणि धुळीमुळे होणाऱ्या समस्यांमुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. हे टाळण्यासाठी हे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याची सूचना माजी खासदार तथा भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री अशोक नेते यांनी केली.
अहेरी येथे भाजपच्या सदस्यता मोहिमेसाठी आले असताना अशोक नेते यांना स्थानिक नागरिक आणि कार्यकर्त्यांनी या प्रश्नाबाबत आपली व्यथा मांडली. यावेळी त्यांनी प्रत्यक्ष कामाचीही पाहणी केली. त्यानंतर या समस्येवर त्यांनी तत्काळ संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत कामाचा आढावा घेतला आणि काम लवकरात लवकर पूर्ण करण्याची सूचना केली. यावेळी सोबत जिल्हा महामंत्री प्रकाश गेडाम, जिल्हा उपाध्यक्ष विनोद आकनपल्लीवार, तालुका महामंत्री सुकमल हलदार व अधिकारी वर्ग उपस्थित होते.
नागरिकांना येणाऱ्या समस्यांचा घेतला आढावा
या अपूर्ण रस्त्यांमुळे नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर गंभीर परिणाम होत आहे. प्रवासाचा वेळ दुप्पट झाला आहे. वाहनचालक, व्यापारी, विद्यार्थी आणि रुग्णवाहिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. खराब रस्त्यांमुळे अपघात वाढले आहेत. तर धुळीमुळे अनेक नागरिकांच्या आरोग्यावरही वाईट परिणाम झाला आहे.
कामाची गुणवत्ता आणि वेळेचे नियोजन करा
रस्त्याच्या कामाची पाहणी करताना मा.खा. नेते यांनी सांगितले की, या प्रकल्पाची वेळेत पूर्तता होणे आवश्यक आहे. नागरिकांना कोणताही त्रास होऊ नये, यासाठी संबंधित विभागाने तातडीने उपाययोजना कराव्यात. कामाची गुणवत्ता आणि वेळेचे नियोजन याला प्राधान्य द्यावे, अशी सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना केली. तसेच या कामाची प्रगती सातत्याने तपासण्याची सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना केली. तसेच अपूर्ण कामामुळे निर्माण झालेल्या अडचणींवर तोडगा काढण्यासाठी नागरिकांनी संयम राखण्याचे आवाहन केले.
हा रस्ता वेळेत पूर्ण झाल्यास दळणवळणाच्या सोयींमध्ये सुधारणा होईलच, पण या परिसराच्या आर्थिक आणि सामाजिक विकासालाही चालना मिळेल. स्थानिक व्यापार, उद्योग आणि शिक्षणाच्या संधींना नवी दिशा मिळेल, असे मा.खा. नेते यांनी यावेळी स्पष्ट केले.