हत्तीच्या हल्ल्यात मूत्यू झालेल्या परिवाराला कंकडालवार यांच्याकडून आर्थिक मदत

भयग्रस्त नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न

भामरागड : जिल्ह्यात रानटी हत्तींचा उपद्रव पुन्हा सुरु झाला आहे. तेलंगणात दोन शेतकऱ्यांचे बळी घेऊन परतलेल्या रानटी हत्तीने काल दुपारी चार वाजता भामरागडच्या कियर जंगलात गोंगलू रामा तेलामी या शेतकऱ्याला पायाखाली चिरडले. यामुळे असहाय्य झालेल्या तेलामी कुटुंबाला जि.प.चे माजी अध्यक्ष तथा काँग्रेस नेते अजय कंकडालवार यांनी आर्थिक मदत दिली.

दोन आठवड्यांपूर्वी प्राणहिता नदी ओलांडून रानटी हत्तीने तेलंगणात प्रवेश केला होता. सीमावर्ती भागात धुडगूस घालत या हत्तीने दोन शेतकऱ्यांचा बळी घेतला होता. त्यानंतर तो पुन्हा गडचिरोली जिल्ह्याच्या हद्दीत परतला. या हत्तीने बल्लाळम येथील घनदाट जंगलात ठाण मांडल्यानंतर 24 एप्रिल रोजी रात्रीपासून आपला मोर्चा कियर जंगलाकडे वळवला.

या जंगलाला चिकटून गोंगलू तेलामी या शेतकऱ्याची जमीन आहे. 25 मे रोजी ते शेतात काम करत असताना रानटी हत्तीने त्यांना सोंडेने उचलून जमिनीवर आपटले. त्यानंतर पायाखाली चिरडले. रानटी हत्तीच्या हल्ल्यात मूत्यू झालेल्या तेलामी यांच्या कुटुंबियांना काँग्रेसचे अहेरी विधानसभा क्षेत्राचे निरीक्षक व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समितीचे सभापती अजय कंकडालवार यांच्याकडून आर्थिक मदत करण्यात आली.

यावेळी सुधाकर तिम्मा, सुखराम मडावी, दल्लू कुडयेटी, सोवा बोगामी यांच्यासह स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच गावातील नागरिक उपस्थित होते.