यावर्षी मलेरियाचे पाच बळी, तरीही गेल्यावर्षीच्या तुलनेत नियंत्रणात

राज्यात आघाडीवर राहण्याचा रेकॅार्ड कायम

गडचिरोली : राज्यात दरवर्षी सर्वाधिक मलेरियाचे रुग्ण आढळणाऱ्या गडचिरोली जिल्ह्यात यावर्षी सप्टेंबर अखेरपर्यंत मलेरियाचे ४५५५ रुग्ण आढळले आहेत. त्यात पाच लोकांचा बळीही गेला. याशिवाय डेंग्यूचेही १६६ रुग्ण आढळले आहेत.

जंगलाचे क्षेत्र जास्त असल्याने डासांची उत्पत्ती वाढते. त्यामुळे राज्यात गडचिरोली जिल्ह्यात मलेरियाचे रुग्ण सर्वाधिक असतात. यावर्षी शासनाकडून नागरिकांना वाटण्यासाठी मच्छदरदाण्या मिळाल्या नाहीत, पण मलेरियाच्या दृष्टिने संवेदनशिल असणाऱ्या १०३८ गावांमध्ये किटकनाशकाची फवारणी करण्यात आली आहे. त्यामुळे मलेरियाची यावर्षीची स्थिती गेल्यावर्षीच्या तुलनेत बरीच दिलासादायक असल्याचे जिल्हा हिवताप अधिकारी डॅा.पंकज हेमके यांनी सांगितले.