हत्तींच्या नुकसानभरपाईत वाढ करण्यासाठी प्रस्ताव तयार करा

सहपालकमंत्री जयस्वाल यांचे निर्देश

गडचिरोली : जिल्ह्यात रानटी हत्तींमुळे होत असलेल्या नुकसानीच्या भरपाईपोटी दिल्या जाणाऱ्या मदतीच्या रकमेत वाढ करण्याचे सुतोवाच राज्याचे वित्त, नियोजन, कृषी, मदत व पुनर्वसन, विधी व न्याय, कामगार राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे सहपालकमंत्री अॅड.आशिष जयस्वाल यांनी केले. त्यासाठी शासन निर्णयात सुधारणा करण्यासंदर्भात प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश त्यांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना दिले.

ना.जयस्वाल यांनी बुधवारी (दि.30) मुख्य वनसंरक्षक कार्यालयात झालेल्या बैठकीत वनविभागाच्या कामांचा आढावा घेतला. यावेळी मुख्य वनसंरक्षक रमेश कुमार, उपवनसंरक्षक मिलीश शर्मा, पूनम पाटे, संजय मीना, राहुल टोलीया आणि वरुण बी.आर. उपस्थित होते. याशिवाय शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राकेश बेलसरे, चंद्रशेखर भडांगे आणि काही शेतकरी उपस्थित होते.

मागील आर्थिक वर्षात जिल्हा वार्षिक योजनेतून वनविभागाने 32 कोटी 46 लाख रुपयांचा निधी खर्च केला. त्या कामांची तपासणी केली जाईल, असेही जयस्वाल यांनी सांगितले.
या बैठकीत मुख्य वनसंरक्षक रमेश कुमार यांनी सादरीकरणाद्वारे वनविभागाच्या विविध उपक्रमांची माहिती दिली.

वनपर्यटनाला चालना द्या

गडचिरोली जिल्हा वेगाने विकसित होत असताना येथील नैसर्गिक वैभव आणि पर्यटनाच्या शक्यतांना चालना देण्यासाठी जिल्ह्यात वनपर्यटन विकसित करण्याचे निर्देशही जयस्वाल यांनी दिले. गुरवाडा वनपर्यटन स्थळ विकसित करून त्या ठिकाणी आकर्षक प्रवेशद्वार, सेल्फी पॉईंट, इकोफ्रेंडली निवास व्यवस्था, हिरवळ, पाणवठे, वन्यजीवांवरील पुस्तकांची लायब्ररी आणि पक्ष्यांसंदर्भात माहिती फलक यासारख्या सुविधा विकसित करण्याचे, तसेच गुरवळासोबतच मार्कंडा येथेही वनपर्यटन विकसित करण्याच्या दृष्टीने आवश्यक ते सर्व उपाय व पूर्वचाचण्या करण्याचे निर्देश जयस्वाल यांनी यावेळी दिले.

वनमहसूल वाढविण्यावर भर

गडचिरोली जिल्ह्यात वनोपजांमधून मिळणारा महसूल राज्यात सर्वाधिक आहे. 2023-24 या आर्थिक वर्षात 470 कोटी तर 2024-25 मध्ये 210 कोटी रुपयांचा महसूल मिळाल्याची माहिती यावेळी देण्यात आली. लाकडाच्या थेट विक्रीऐवजी त्यापासून फर्निचर तयार करून विक्री केल्यास महसूल अधिक वाढू शकतो. त्यासाठी लागणारा निधी मागणीनुसार उपलब्ध करून दिला जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले.

मानव वन्यजीव संघर्ष, संवेदनशिल बना

रानटी हत्ती आणि वाघ-मानव संघर्षामुळे होत असलेल्या नुकसानीबाबत या बैठकीत चर्चा झाली. यावेळी त्यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी थेट संवाद साधला. गजानन डोंगरवार या शेतकऱ्याच्या शेतात हत्तीमुळे नुकसान झाले, पण वन विभागाने त्याची दखल घेतली नाही, अशी तक्रार डोंगरवार यांनीकेली. याबाबत जयस्वाल यांनी नाराजी व्यक्त करून एका तासात संबंधितांच्या अर्जावर कारवाई करण्याचे निर्देश वन विभागाला दिले. वनविभागाने सर्वच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांप्रती अधिक संवेदनशील राहून त्यांना शासकीय मदत तत्परतेने उपलब्ध करून द्यावी, असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले.