गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सौर उर्जेतून मिळणार भरवशाची वीज

काय आहे सरकारची योजना, वाचा

गडचिरोली : जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या शेतात नियमित दिवसा वीज पुरवठ्याचा प्रश्न कायमस्वरूपी दूर करण्यासाठी सौर उर्जा निर्मिती प्रकल्पाची उभारणी केली जाणार आहे. त्याचे टेंडरही झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मदतीमुळे ऊर्जा क्षेत्राच्या सुधारणेसाठी आरडीएसएस ही योजना राबविण्यात येत आहे. त्यापैकी गडचिरोली जिल्ह्यात ८६७ कोटी रुपयांची कामे होणार आहेत, अशी माहिती एमएसईबी होल्डिंग कंपनीचे संचालक विश्वास पाठक यांनी दिली. गडचिरोली येथे आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते.

महावितरण, महापारेषण, महाऊर्जा व विद्युत निरीक्षण या विभागांची संयुक्त जिल्हा आढावा बैठक त्यांनी गुरूवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात घेतली. यावेळी खासदार अशोक नेते, आमदार कृष्णा गजबे, महावितरणचे मुख्य अभियंता सुनील देशपांडे आणि महापारेषणचे मुख्य अभियंता सतीश अणे उपस्थित होते.

यावेळी खा.अशोक नेते यांनी सांगितले की, शेतकऱ्यांना वीज जोडणी देण्याच्या कामास गती देण्याची गरज आहे. कारण अनेक शेतकऱ्यांनी डिमांड भरूनही त्यांना जोडणीसाठी प्रतीक्षा करावी लागत आहे. जिल्ह्याच्या दुर्गम भागात महाऊर्जामार्फत सौर ऊर्जा प्रकल्प बसविल्यानंतर त्यांची नियमित देखभालही आवश्यक असल्याची सूचना त्यांनी यावेळी केली.

गडचिरोली जिल्ह्यात वीज ग्राहकांना सेवा देताना जंगल, दुर्गम प्रदेश आणि रस्त्यांची मर्यादा ध्यानात घेता महावितरण व महापारेषणला वीज पुरवठ्याचे प्रकल्प अंमलात आणण्यासाठी मदत करण्याची तयारी खा.अशोक नेते व आमदार कृष्णा गजबे यांनी व्यक्त केली.

यावेळी बोलताना पाठक यांनी दुर्गम व जंगलांचा प्रदेश असलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील प्रत्येक गावातल्या शेवटच्या घरापर्यंत वीज ग्राहकांना चांगली सेवा देण्यासाठी वीज कंपन्या तत्पर आहेत. मात्र त्यात कुठे काही अडचण येत असल्यास जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींची मदत घ्यावी, अशी सूचना केली. महावितरणच्या अधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील ऊर्जा प्रकल्पांबाबत लोकप्रतिनिधींना नियमितपणे माहिती द्यावी आणि प्रकल्पाच्या अंमलबजावणीतील अडथळे दूर करण्यासाठी त्यांची मदत घ्यावी, अशी सूचना यावेळी पाठक यांनी केली.

साडेतीन हजार मेगावॅट क्षमतेची वीज निर्मिती होणार

शेतीसाठी दिवसा वीज पुरवठा करण्याची मागणी यावेळी खासदार नेते आणि आमदार गजबे यांनी केली. त्यावर बोलताना पाठक म्हणाले, शेतकऱ्यांना दिवसा सिंचनासाठी वीज पुरवठा करण्याच्या हेतूने उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० या योजनेला चालना दिली आहे. या योजनेत सौरऊर्जेचा वापर करून सात हजार मेगावॅट वीजनिर्मिती करण्यात येईल. त्याद्वारे शेतकऱ्यांना दिवसा भरवशाचा वीज पुरवठा केला जाईल. यापैकी साडेतीन हजार मेगावॅट क्षमतेच्या सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्पाच्या उभारणीसाठीचे टेंडर प्रसिद्ध झाले असल्याची माहिती त्यांनी दिली. महावितरण, महापारेषण, महाऊर्जा व विद्युत निरीक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी यावेळी गडचिरोली जिल्ह्यातील कंपन्यांच्या कामांचे सादरीकरण केले.