डेंग्युग्रस्त रामपूरमध्ये सर्व्हेक्षणात्मक तपासणी, आतापर्यंत 18 रुग्ण आढळले पॅाझिटिव्ह

एका वृद्धाला मृत्यू, पण डेंग्युमुळे नव्हे

गडचिरोली : चामोर्शी तालुक्यातील रामपूर गावामध्ये डेंग्युचा उद्रेक झाल्यानंतर आरोग्य विभागाने गावात स्थानिक आरोग्य कर्मचाऱ्यांव्दारे गावात गृहभेटीचे नियोजन करून डेंग्यू सर्व्हेक्षण मोहिम राबविण्यात आली. सदर सर्व्हेक्षणाव्दारे संशयित रुग्णांचे रक्त नमुने संकलित करून ग्रामिण रुग्णालय आष्टी येथे तपासणी केली असता दि.27 पर्यंत 18 रुग्ण डेंग्यू पॅाझिटिव्ह आढळून आले आहेत.

रामपूर गावात 26 मे रोजी एका 82 वर्षाच्या व्यक्तीचा दुर्धर आजाराने मृत्यू झाला. त्या रुग्णाला डेंग्युची कोणतीही लक्षणे आढळून आलेली नाहीत. त्या मृत व्यक्तीला मधुमेह, उच्च रक्तदाबाचा त्रास होता. तसेच दोन वर्षापूर्विपासून पक्षाघाताने ते अंथरुनाला खिळून होते.

रामपूर गावात डेंग्यू आजाराची वाढ त्वरीत रोखण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य विभागाकडून उपाययोजना सुरु आहेत. रामपूर गावात आरोग्य विभागामार्फत पथक तयार करुन दैनंदिन डेंग्यू संशयित रुग्ण सर्वेक्षण, तसेच कंटेनर सर्व्हेक्षणाचे काम सुरु असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.प्रताप शिंदे यांनी दिली.

गावात आढळून आलेल्या डासोत्पत्ती स्थानांत, तसेच शेततळयात आणि कार्यक्षेत्रातील सर्व खासगी व सार्वजनिक निरुपयोगी विहिरींमध्ये आरोग्य कर्मचाऱ्यामार्फत गप्पी मासे सोडण्याची कार्यवाही सुरु आहे. गृहभेटीव्दारे घराच्या छतावर आढळलेले फुटके डबे, टाकाऊ टायर्स, कप, मडकी ईत्यादीची योग्य विल्हेवाट लावण्यात आली. तसेच शौचालयाच्या व्हेंट पाईपला जाळी कापड बांधण्यात आले. सर्व्हेक्षणादरम्यान आढळलेल्या डासोत्पत्ती स्थानात टेमिफॉस अळीनाशक फवारणी करण्यात आले. डेंग्यू व हिवताप आजाराचे रुग्ण वाढू नये याकरीता आरोग्य प्रशासनाव्दारे गावात फवारणी पथक तैनात करून सदर कर्मचाऱ्यांव्दारे फॉगिंग मशीनच्या सहाय्याने कीटकनाशक फवारणी सलग 3 दिवस केल्याची माहिती जिल्हा हिवताप अधिकारी डॉ.लोकेशकुमार कोटवार यांनी दिली.

डेंग्यू आजाराच्या प्रतिबंधासाठी आरोग्य विभागातील कर्मचाऱ्याव्दारे प्रभावी नियमित डास अळी सर्वेक्षण, तपासणी, उपचार, एकात्मिक कीटक व्यवस्थापन व लोकसहभाग प्राप्त करून घेण्यासाठी गावात जनजागृती करण्यात येत आहे. कार्यक्षेत्रात बांधकाम होत असलेल्या परिसरात पाणी साचून डासोत्पत्ती होणार नाही याबाबत ग्राम प्रशासनास निर्देश देण्यात आले. ग्राम पंचायत कार्यक्षेत्रातील पाण्याकरीता ठेवण्यात येणाऱ्या साठ्यांमध्ये डासाच्या अळया तयार होण्याची शक्यता असल्याने त्यांना ग्राम पंचायततर्फे पाण्याच्या साठे झाकून ठेवण्याबाबत व त्याची योग्य निगा राखण्याबाबत सूचित करण्यात आले आहे. निरुपयोगी प्लॉस्टिकच्या वस्तू ज्यात पाणी साचून डास अळी तयार होत असल्याने या वस्तूंची आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत योग्य विल्हेवाट लावण्यात येत आहे, असे जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी कळविले.