गडचिरोली : अमृत योजना 2.0 अंतर्गत आरमोरी शहरातील सर्व घरांना पुरेशा प्रमाणात पाणीपुरवठा करण्यासाठी 57 कोटींच्या पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल यांच्या हस्ते गुरूवारी (दि.15) करण्यात आले. यात 91 किलोमीटरच्या पाईपलाईनच्या माध्यमातून प्रत्येक घराला पाणी मिळण्याचे नियोजन केले जाणार आहे.
या कार्यक्रमाप्रसंगी खासदार डॅा.नामदेव किरसान, माजी खासदार डॅा.अशोक नेते, आमदार रामदास मसराम, माजी आमदार कृष्णा गजबे, तहसीलदार उषा चौधरी, काँग्रेसे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

वेगवान प्रगतीसाठी सर्वांनी एकत्र यावे
सामान्य माणसाच्या अडचणी सोडवून आरमोरीसह संपूर्ण जिल्ह्याचा सर्वांगीण विकास जलद गतीने साधायचा असेल, तर सर्व जनप्रतिनिधी, प्रशासन आणि नागरिकांनी एकत्र येऊन समन्वयाने काम केले पाहिजे, असे मत यावेळी ना.जयस्वाल यांनी व्यक्त केले. पाणीपुरवठा योजनेचे काम गुणवत्तापूर्ण व दर्जेदार करण्याचे निर्देश देतानाच पाइपलाईन टाकण्यासाठी खोदलेले रस्ते त्वरित पूर्वस्थितीत करण्याचे व त्यामुळे नागरिकांना कोणताही त्रास होणार नाही, याची दक्षता घेण्याची सूचना जयस्वाल यांनी केली.
नगर परिषदेच्या मुख्याधिकारी माधुरी सलामे यांनी प्रास्ताविकातून अमृत पाणीपुरवठा योजनेची माहिती दिली. कार्यक्रमाला नगरपरिषद, महसूल विभागाचे अधिकारी, कर्मचारी तसेच नागरिक उपस्थित होते.