हे गुलाबी ‘वादळ’ ठरणार, की निव्वळ ‘वावटळ’?

अहेरीचा गड काबिज करणे भारत राष्ट्र समितीसाठी कठीण

गडचिरोली : तेलंगणात सत्तारूढ असलेल्या के.चंद्रशेखर राव यांच्या नेतृत्वातील भारत राष्ट्र समितीने आपल्या पक्षाचा विस्तार करण्यासाठी महाराष्ट्रातील काही लोकसभा आणि विधानसभा मतदार संघांवर लक्ष केंद्रीत केले आहे. गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी विधानसभा मतदार संघावर आधीपासूनच तेलगू भाषिकांचा प्रभाव असल्यामुळे अहेरी मतदार संघावर त्यांचा डोळा आहे. त्यासाठी माजी आमदार दीपक आत्राम यांना आपल्या पक्षात घेऊन केसीआर यांनी मोठी चाल खेळली आहे. पण दीपकदादांचे उजवे हात असणाऱ्या अजय कंकडालवार यांना डावलून दादांनी बीआरएसच्या तंबूत प्रवेश केल्याने विधानसभेचे लक्ष्य गाठणे त्यांना शक्य होईल का? असा प्रश्न या मतदार संघात चर्चेचा विषय झाला आहे.