गडचिरोली : राज्य शासनाच्या ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-2026’ अंतर्गत गडचिरोली जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांच्या याद्या शासनाकडून प्राप्त झाल्या आहेत. या योजनेच्या पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील 2,539 शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र ठरले आहेत. त्यांचे एकूण ₹11 कोटी 74 लाख 66 हजार इतके कर्ज माफ केले जाणार आहे. पात्र शेतकऱ्यांच्या याद्या जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था कार्यालय, सहाय्यक निबंधक कार्यालय, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, प्राथमिक कृषी पतपुरवठा सहकारी संस्था तसेच गावपातळीवर प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. संबंधित शेतकऱ्यांनी आपण पात्र आहोत का, याची खात्री करून घ्यावी.
राज्य शासनाने राबविलेली ही योजना संपूर्णपणे ऑनलाईन व आधार क्रमांकावर आधारित असून पात्र कर्ज खात्यांची माहिती बँकांकडून थेट शासनाच्या पोर्टलवर अपलोड करण्यात आली आहे. गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने यासाठी 2,926 पात्र कर्ज खात्यांची माहिती शासनाच्या पोर्टलवर अपलोड केली होती. त्यानुसार शासनाकडून पात्र लाभार्थ्यांच्या याद्या प्राप्त झाल्यानंतर त्या तातडीने शाखा, संस्था आणि गावपातळीवर प्रसिद्ध करण्यात आल्या. मात्र, या योजनेचा प्रत्यक्ष लाभ मिळण्यासाठी पात्र शेतकऱ्यांनी आपल्या कर्ज खात्याचे बायोमेट्रिक अथवा आधार प्रमाणीकरण करून घेणे अनिवार्य आहे. प्रमाणीकरण पूर्ण झाल्यानंतरच संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यावर कर्जमाफीची प्रक्रिया पूर्ण होणार असल्याने पात्र लाभार्थ्यांनी विलंब न करता आवश्यक कार्यवाही करावी, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.
यादी प्रसिद्ध करण्याच्या कार्यक्रमाला जिल्हा उपनिबंधक मुकुंद मेश्राम, या कार्यालयाचे अधीक्षक लोमेश रंधये, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश आयलवार, कर्ज विभागाचे सरव्यवस्थापक राजू सोरते, उपसरव्यवस्थापक चंद्रशेखर तोटावर, संबंधित संस्थांचे व्यवस्थापक तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.
शेतकऱ्यांनी यादीतील आपला क्रमांक किंवा आधार क्रमांक घेऊन जवळच्या ‘आपले सरकार सेवा केंद्र’ अथवा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखेत तातडीने जाऊन बायोमेट्रिक / आधार प्रमाणीकरण पूर्ण करावे, जेणेकरून कर्जमुक्ती योजनेचा लाभ वेळेत प्राप्त होऊ शकेल, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांसह संबंधित अधिकाऱ्यांनी केले आहे.






























