स्वच्छता आणि पाण्याच्या समस्येचे निवारण करा, युवक काँग्रेसचे न.प.ला निवेदन

नाली सफाईची निविदाच काढली नाही

गडचिरोली : शहरातील विविध समस्यांचे गाऱ्हाणे घेऊन युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी बुधवारी गडचिरोली नगर परिषदेच्या कार्यालयात धडक दिली. यावेळी शहरातील नाल्यांच्या सफाईसह पिण्याच्या पाण्याचा पुरेसा पुरवठा करण्याचा मुद्दा गांभिर्याने घ्या, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा प्रदेश युवक काँग्रेसचे सचिव अॅड.विश्वजीत मारोतराव कोवासे यांनी दिला.

युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी शहरातील विविध समस्यांचे निवेदन मुख्याधिकारी सूर्यकांत पिदुरकर यांच्याकडे देऊन चर्चा केली. मागील तीन वर्षापासून संपूर्ण महाराष्ट्रासह गडचिरोली नगर पालिकेमध्ये प्रशासनराज सुरू आहे. मागील वर्षभरापासून शहरातील नालीसफाईची कामे योग्य पद्धतीने न करता थातुरमातूर केली जात आहे. विशेष म्हणजे मागील तीन वर्षापासून पालिका प्रशासनाने नाली सफाईची निविदा न काढता जुन्याच कंत्राटदाराला मुदतवाढ दिली आहे. त्या कंत्राटदाराकडून थातूरमातूर कामे करून बिलं लाटली जात आहे. नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित असलेल्या या स्वच्छतेच्या कामासाठी तात्काळ नवीन निविदा काढाव्या, तसेच डासनाशकाची संपूर्ण शहरात फवारणी करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली.

भूमिगत गटार योजनेचे काम नगर पालिकेतर्फे करण्यात आले. सदर काम करीत असताना कंत्राटदाराने शहरातील रस्त्यावरील पाच चेंबर उंचावर घेतल्यामुळे अनेक अपघात होत असतात. घरगुती चारचाकी वाहनांचे चेंबर फुटले आहेत. त्यामुळे सदर कंत्राटदाराला रस्त्याची कामे योग्य पद्धतीने करण्याचे आदेश द्यावे अशीही मागणी करण्यात आली.

शहराच्या अनेक भागात पुरेशा प्रमाणात पाणी पुरवठा होत नाही. त्यामुळे दिवसातून दोन वेळा पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात यावा. बहुसंख्य वार्डातील पथदिवे बंद आहेत ते लवकरात लवकर सुरू करण्यात यावे. स्मशानभूमीमध्ये पाण्याची व्यवस्था करण्यात यावी. अशा विविध मागण्या करण्यात आल्या. मुख्याधिकारी यांनी येत्या सात दिवसात या सर्व मागण्या पुर्ण करण्याचे आश्वासन दिले.

यावेळी काँग्रेसचे शहराध्यक्ष सतीश विधाते, तालुकाध्यक्ष वसंत राऊत, युवक काँग्रेसचे महासचिव कुणाल पेंदोरकर, अतुल मल्लेरवार, तसेच दत्तात्रय खरवडे, प्रमोद वैद्य, कमलेश खोब्रागडे, सुरेश भांडेकर, रमेश चौधरी, नंदु वाईलकर, समीर ताजने, संजय चन्ने, नितेश राठोड, माजीद सय्यद, लता मुरकुटे, गौतमा गेडाम, गीतांजली सूर्यवंशी, मनीषा सूर्यवंशी, लता मुरकुटे, मधुकर नाईक, प्रफुल आंबोरकर, जावेद खान, अजय भांडेकर, प्रभाकर वासेकर, गुलाब मडावी, सुनील डोगरा, विवेक घोंगडे, संजय मेश्राम, जावेद शेख, सर्वेश पोपट, हेमंत मोहितकर, कल्पक मुप्पीडवार, कुणाल ताजने, टया खान आदी अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.