सहा लाखांचे ईनाम असणाऱ्या छत्तीसगडी नक्षलवाद्याची गडचिरोली पोलिसांपुढे शरणागती

काय होती चळवळ सोडण्याची कारणे? वाचा

गडचिरोली : राज्य शासनाच्या आत्मसमर्पण योजनेनुसार शांततेत जीवन जगण्यासाठी एका जहाल नक्षलवाद्याने गडचिरोलीत मंगळवारी (दि.28) आत्मसमर्पण केले. गणेश गट्टा पुनेम असे त्याचे नाव असून तो छत्तीसगड राज्यातील रहिवासी आहे. त्याच्यावरील अनेक गुन्हे पाहता त्याच्यावर 6 लाखांचे ईनाम राज्य शासनाने ठेवले होते. सीआरपीएफचे पोलिस उपमहानिरीक्षक जगदीश मीना यांच्यापुढे आत्मसमर्पण केल्यानंतर त्याला गडचिरोली पोलिसांकडे सुपूर्द करण्यात आले.

गणेश गट्टा पुनेम (35 वर्ष) रा.बेच्चापाल, ता.भैरमगड, जि.बिजापूर (छ.ग.) हा सन 2017 मध्ये भैरमगड भागातील पुरवठा टिममध्ये सदस्य पदावर भरती झाला होता. 2018 मध्ये पुरवठा टिममध्ये त्याला उपकमांडर पदावर बढती मिळाली. या काळात त्याने दोन चकमकीत सहभाग घेतला आहे.

या आत्मसमर्पणासाठी सीआरपीएफचे पोलिस उप-महानिरीक्षक (अभियान) जगदीश मीणा व गडचिरोलीचे पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली, सीआरपीएफचे उप-कमांडण्ट नितीन कुमार यांच्या नेतृत्वाखाली आरएफटी (रेंज फिल्ड टीम)च्या इंट सेल पथकाने पुढाकार घेतला. विकासकामांना आडकाठी निर्माण करणा­ऱ्या माओवाद्यांवर कारवाई करण्यास पोलिस दल तत्पर असून जे नक्षलवादी विकासाच्या प्रवाहात सहभागी होण्यास ईच्छुक असतील त्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी, तसेच लोकशाहीतील सन्मानाचे जीवन जगण्यासाठी गडचिरोली पोलिस दल सर्वतोपरी मदत करेल, असे आवाहन पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी केले.

…म्हणून केले आत्मसमर्पण

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नक्षल दलममध्ये अहोरात्र भटकंतीचे जीवन असून स्वत:च्या आरोग्याविषयी समस्या उद्भवल्यास त्याकडे काळजीपूर्वक लक्ष दिल्या जात नाही, दलममधील वरिष्ठ कॅडरचे नक्षलवादी, चळवळीकरीता / जनतेकरीता पैसे गोळा करण्यास सांगतात पण प्रत्यक्षात गोळा केलेला पैसा स्वत:साठीच वापरतात. जनतेच्या विकासासाठी कधीच वापरला जात नाही, वरिष्ठ माओवादी नेते फक्त स्वत:च्या फायद्यासाठी गरीब आदिवासी युवक-युवतींचा वापर करून घेतात. दलममध्ये असताना विवाह झाले तरीही वैवाहिक स्वतंत्र आयुष्य जगता येत नाही. गडचिरोली पोलिस दलाच्या आक्रमक नक्षलविरोधी अभियानामुळे नक्षल कारवायांचे कंबरडे मोडले आहे. वरीष्ठ नक्षलवादी नेते पोलिस खबरी असल्याच्या संशयावरून आमच्याच निष्पाप बांधवांना ठार मारायला सांगतात, अशा कारणांमुळे नक्षलवादी आत्मसमर्पणाचा मार्ग स्वीकारत आहेत.

आतापर्यंत 662 जणांनी सोडली नक्षल चळवळ

शासनाने जाहीर केलेल्या आत्मसमर्पण योजनेमुळे तसेच हिंसाचाराच्या जीवनाला कंटाळून अनेक जहाल नक्षलवादी चळवळ सोडत आहेत. पोलिस दल त्यांचे पुनर्वसन घडवून आणत असल्यामुळे आजपर्यंत 662 जणांनी गडचिरोली पोलिस दलासमोर आत्मसमर्पण केले आहे. त्यात 2022 चे 2024 या अडीच वर्षात 14 जणांनी आत्मसमर्पण योजनेनुसार नक्षल चळवळीचा त्याग केला.