दुसऱ्या हंगामाची वेळ आली, आता शेतकऱ्यांना धानाचा बोनस कधी?

ओबीसी काँग्रेसचे ढोरे यांचा सवाल

देसाईगंज : जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी 20 हजार रुपये बोनस देण्याचा शासन निर्णय 25 मार्च रोजी निर्गमित केला आहे. याला आता दिड महिन्याचा कालावधी उलटला आहे, मात्र शेतकऱ्यांना प्रत्यक्षात बोनस देण्याबाबत कोणत्याही हालचाल शासनाकडून दिसून येत नाही. हा बोनस कधी देणार, असा सवाल ओबीसी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस मनोज ढोरे यांनी उपस्थित केला आहे.

वाढलेला उत्पादन खर्च, धानाला मिळणारा कमी भाव यामुळे धानाची शेती करणे दिवसेंदिवस तोट्याचे होत आहे. या शेतकऱ्यांना थेट आर्थिक मदत देण्यासाठी शासनाने प्रतिहेक्टरी 20 हजार रुपये प्रोत्साहन रक्कम देण्याचे विधानसभा निवडणुकीपूर्वी जाहीर केले. मात्र त्यासंदर्भातील शासन निर्णय 25 मार्चला काढला. त्यानंतर ही रक्कम मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र आता दिड महिना उलटला तरीही प्रोत्साहन भत्त्याची रक्कम देण्यात आली नाही.

जिल्हाभरातील शेतकरी प्रोत्साहन अनुदानासाठी प्रतीक्षा करीत आहेत. त्यासाठी बँकेत चकराही मारताना दिसतात. आता तर दुसऱ्या हंगामाची सुरुवात होत आहे. खरीप पिकाची लागवड सुरू करण्यासाठी आता केवळ महिनाभराचा कालावधी शिल्लक आहे. नवीन हंगामाचे नियोजन करण्यास शेतकऱ्यांनी सुरुवात केली आहे. 15 दिवसानंतर बियाणे खरेदीची लगबग वाढणार आहे. हा खर्च भागविण्यासाठी शेतकरी प्रोत्साहन रकमेची प्रतीक्षा करीत आहेत. शासनाने शेतकऱ्यांकडे लक्ष देऊन त्वरित त्यांच्या खात्याला बोनसची रक्कम जमा करावी, अशी मागणी प्रदेश काँग्रेस कमिटी ओबीसी विभागाचे सरचिटणीस मनोज ढोरे यांनी पत्रकातून केली आहे.