सर्व शाळा-महाविद्यालयात कॅमेरे लावा, मंत्री डॉ.धर्मरावबाबा आत्राम यांचे निर्देश

जिल्हा परिषदेच्या कामांचा घेतला आढावा

गडचिरोली : बदलापूरसारखी दुर्दैवी घटना आपल्या जिल्ह्यात घडू नये यासाठी दक्षता घेणे आवश्यक आहे. जिल्ह्यातील सर्व शासकीय व खासगी शाळा आणि महाविद्यालयात शासकीय नियमानुसार तातडीने सीसीटीव्ही लावा, असे निर्देश अन्न व औषध प्रशासनमंत्री डॉ.धर्मरावबाबा आत्राम यांनी गुरूवारी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात ना.आत्राम यांनी जिल्हा परिषदेच्या कामकाजाचा आढावा घेतला. त्यावेळी ते बोलत होते. जिल्हाधिकारी संजय दैने, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंह, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भुयार, उपवनसंरक्षक पुनम पाटे, सिनेट सदस्य तनुश्री आत्राम यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते.

यावेळी ना.आत्राम यांनी अधिकाऱ्यांना काही सूचनाही केल्या. त्यात शाळेपासून 500 मिटर परिसरात पानटपऱ्यांना प्रतिबंध आहे. याबाबतच्या शासन निर्णयाची कडक अंमलबजावणी करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. शाळकरी बालकांचे योग्य पोषण व्हावे म्हणून शासनाने पोषण आहार योजना सुरू केली आहे. त्यांच्यासाठी मिळालेले धान्य सुस्थितीत ठेवण्यात आले आहे का, त्याचा योग्य वापर होतो का, याबाबत केंद्रप्रमुख आणि शिक्षणाधिकारी यांनी विविध शाळांना नियमित भेटी देऊन तपासणी करण्याचेही निर्देश धर्मरावबाबांनी दिले. आरोग्य विभागाचा आढावा घेताना सर्व शासकीय रुग्णालयांत स्वच्छतेकडे प्राधान्याने लक्ष देण्याचे व त्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

अहेरी उपविभागात पूर परिस्थितीमुळे बंद असलेली बससेवा पुर्ववत सुरू करावी आणि शाळेच्या वेळेनुसारच बस सोडण्याची खबरदारी घ्यावी, जिल्ह्यासाठी मंजूर करण्यात आलेल्या मानव विकासच्या 55 बसगाड्या मागिल 1 वर्षापासून मिळाल्या नाहीत, त्या तातडीने मिळण्याबाबत परिवहन विभागाने पाठपुरावा करावा, बांधकाम विभागाने रस्ते दुरुस्तीच्या कामांची गंभीरपणे दखल घेऊन महत्त्वपूर्ण रस्ते लवकर पूर्ण करावे, आदी सूचना त्यांनी दिल्या. नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यातील नागरिकांचा शासनावर विश्वास वाढत असून त्यांच्या अपेक्षाही वाढल्या आहेत. अधिकाऱ्यांनी नागरिकांची कामे तत्परतेने पूर्ण करून त्यांचा विश्वास सार्थ ठरवा, अशी सूचना डॉ.आत्राम यांनी अधिकाऱ्यांना केली.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना मिळणारे पैसे त्यांनी काळजीपूर्वक खर्च करावे. गरजेच्या वेळी उपयोगी पडण्यासाठी ते बँकेतच जपून ठेवावे. शासनाने सुरू केलेल्या जनकल्याणाच्या विविध योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन ना.आत्राम यांनी केले. आयुषी सिंह यांनी सादरीकरणाद्वारे जिल्हा परिषदेच्या विविध कामांची माहिती दिली. जिल्हा परिषदेअंतर्गत 580 पदांसाठी पदभरती सुरू आहे. यातील 10 उमेदवारांना मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले.

या आढावा बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रविंद्र वासेकर, रायुकाँचे लिलाधर भरडकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.माधुरी किलनाके, जिल्हा नियोजन अधिकारी श्रीराम पाचखेडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.प्रताप शिंदे, जिल्हा समाजकल्याण अधिकारी चेतन हिवंज, शिक्षणाधिकारी भुसे, तसेच जिल्हा परिषदेचे विविध अधिकारी उपस्थित होते.