५००५ अधिकारी-कर्मचाऱ्यांची मतदान प्रक्रियेसाठी निवड, २६८३ जण राखीव

अधिकाऱ्यांची सरमिसळ प्रक्रिया पूर्ण

गडचिरोली : लोकसभा निवडणुकीकरिता मतदान अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची द्वितीय सरमिसळीकरणाची (रॅण्डमायझेशन) प्रक्रिया मंगळवारी पूर्ण करण्यात आली.

निवडणूक निरीक्षक अनिमेष कुमार पराशर, जिल्हा निवडणूक अधिकारी संजय दैने, उपजिल्हा निवडणूक अधिकारी विवेक घोडके, नोडल अधिकारी प्रशांत शिर्के व विवेक साळुंखे, जिल्हा विज्ञान व सूचना अधिकारी एस.आर.टेंभुर्णे तसेच राजकीय पक्षांचे प्रतिनिधी सुनील चडगुलवार, भारत खटी आदी यावेळी उपस्थित होते.

मतदान केंद्राध्यक्ष, सहायक केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी क्रमांक 2 आणि मतदान अधिकारी क्रमांक 3 यांची सरमिसळ प्रक्रिया जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राष्ट्रीय सूचना केंद्रात संगणक प्रणालीद्वारे पूर्ण करण्यात आली. यात जिल्ह्यातील आरमोरी, गडचिरोली व अहेरी या तीन विधानसभा मतदारसंघाकरिता एकूण 5005 मतदान अधिकाऱ्यांची निवड करण्यात आली. 2683 कर्मचारी राखीव ठेवण्यात आले आहेत.

आरमोरी क्षेत्राकरिता 1571 पुरूष व 19 महिला, गडचिरोली क्षेत्राकरिता 1852 पुरूष व 22 महिला तर अहेरी विधानसभा क्षेत्राकरिता 1521 पुरूष व 20 महिला मतदान अधिकाऱ्यांची निवड करण्यात आली आहे. संबंधित विधानसभा मतदार क्षेत्रात मतदान केंद्रनिहाय अधिकारी नियुक्त करण्यासाठी त्या-त्या विधानसभा मतदार क्षेत्रनिहाय पुन्हा सरमिसळीची अंतिम प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे.