मागासलेपण दूर करून गडचिरोली जिल्ह्याला अव्वलस्थानी आणायचे आहे- ना.आत्राम

एटापल्लीत राष्ट्रवादीचा कार्यकर्ता मेळावा

एटापल्ली : गडचिरोली जिल्हा मागास आहे हा ठप्पा पुसून काढून राज्यात या जिल्ह्याला अव्वलस्थानी, अर्थात प्रथम क्रमांकावर आणण्यासाठी आमची धडपड सुरू आहे. औद्योगिकरणातून या भागाचा सर्वांगीण विकास होईल, असे प्रतिपादन राज्याचे अन्न व औषध प्रशासनमंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी केले. 19 जुलै रोजी एटापल्ली येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्ता मेळाव्यात अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.

यावेळी मंचावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र वासेकर, माजी जिल्हा परिषद सदस्य संजय चरडुके, प्रदेश सरचिटणीस युनूस शेख, तालुका अध्यक्ष श्रीकांत कोकुलवार, राष्ट्रवादी महिला काँग्रेसचे तालुकाध्यक्षा तथा येमलीच्या सरपंच ललिता मडावी, सामाजिक कार्यकर्ते कैलास कोरेत, माजी प्राचार्य रतन दुर्गे, माजी जिल्हा परिषद सदस्य ग्यानकुमारी कौशिक, नागुलवाहीचे उपसरपंच देऊ पुंगाटी, नागुलवाहीचे उपसरपंच राजू तिम्मा, जारावंडीच्या सरपंच सपना कोडापे, जवेलीचे सरपंच मुन्ना पुंगाटी, माजी सरपंच नामदेव लेकमी, उडेरा ग्रा.पं.चे उपसरपंच बापू गावडे, गुरुपल्लीचे सरपंच कैलास उसेंडी आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

ना.धर्मरावबाबा आत्राम म्हणाले की, जिल्हा उद्योगविरहित आहे. जिल्ह्याचा व प्रामुख्याने अहेरी उपविभागाचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी ओद्योगिक क्षेत्रात क्रांती घडवून आणण्यासाठी व गडचिरोली जिल्ह्याला इंडस्ट्रीज हब बनविण्यासाठी महायुती सरकार अनुकूल आहे. मुख्यतः महिलांच्या सक्षमीकरणासाठी व स्वावलंबनासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना कार्यान्वित करण्यात आली. राज्यात महायुती सरकार अनेक क्रांतिकारक, ऐतिहासिक, लोकाभिमुख निर्णय घेत आहे. जनतेनी अशा कार्यक्षम सरकारच्या, पर्यायाने आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे, असे म्हणत ना.आत्राम यांनी गोंडी भाषेत मोलाचे मार्गदर्शन केले.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस युनूस शेख, जिल्हाध्यक्ष रवींद्र वासेकर, माजी प्राचार्य रतन दुर्गे, सामाजिक कार्यकर्ते कैलास कोरते यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची ध्येयधोरणे सांगून मंत्री धर्मरावबाबा यांच्या कार्यावर प्रकाश टाकला. उल्लेखनीय म्हणजे भर पावसात व रोवणीचा हंगाम सुरू असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्ता मेळाव्यात तुडूंब गर्दी होती.

प्रास्ताविक संजय चरडुके यांनी तर संचालन सुरेंद्र अलोणे यांनी केले. आभार श्रीकांत कोकुलवार यांनी मानले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, शेतकरी, महिला भगिनी व तालुक्यातील नागरिक उपस्थित होते.

राष्ट्रवादीच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन

यावेळी ना.धर्मरावबाबा आत्राम यांच्या हस्ते येथील मुख्य चौकात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जनसंपर्क कार्यालयाचे फित कापून उद्घाटन करण्यात आले. यामुळे पक्षाला नवी उभारी मिळणार आहे. या कार्यक्रमाला जनसंपर्क कर्यालयाचे प्रमुख, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.