अजितदादांच्या बंडाची कल्पना होती, राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुखांची कबुली

दादांकडून काय होती त्यांना ऑफर, ऐका

गडचिरोली : राष्ट्रवादी काँग्रेसमधील काही वरिष्ठ पदाधिकारी अजित पवार यांच्या नेतृत्वात वेगळा गट स्थापन करणार याची कुणकुण लागली होती. त्यामुळे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, सुप्रिया सुळे आणि मी त्यांच्या बैठकांमध्ये जाऊन त्यांना बंड करण्यापासून रोखण्याचाही प्रयत्न केला, अशी महत्वपूर्ण माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली. ते गडचिरोलीत शुक्रवारी सायंकाळी पत्रकारांशी बोलत होते. त्यांच्या या कबुलीमुळे अजित पवारांचे बंड हे एकाएकी घडलेले नव्हते हे स्पष्ट झाले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या (श.प.) संघर्ष यात्रेची माहिती देण्यासाठी आणि कार्यकर्त्यांना जागरूक करण्यासाठी देशमुख गडचिरोलीत आले होते. विश्राम भवनात आयोजित पत्रकार परिषदेला युवक राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष तथा संघर्ष यात्रेचे समन्वयक रविकांत वरपे, पक्षाचे निरीक्षक राजेंद्र वैद्य, जिल्हाध्यक्ष अतुल गण्यारपवार, ज्येष्ठ नेते सुरेश सावकार पोरेड्डीवार, सुरेश गुडधे, अॅड.संजय ठाकरे, विजय गोरडवार, श्याम धाईत, प्रकाश ताकसांडे, शेमदेव चापले आदी अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

२२ ऑक्टोबरला पुणे येथून आ.रोहीत पवार यांच्या नेतृत्वात सुरू झालेली ही संघर्ष यात्रा २५ दिवसात ८०० किलोमीटरचा प्रवास करत (पायी) १२ डिसेंबरला नागपूर येथे पोहोचणार आहे. नागपुरात पक्षाध्यक्ष शरद पवार या यात्रेला मार्गदर्शन करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

या संघर्ष यात्रेतून कंत्राटी कायदा रद्द करा, पोलिस भरती करा, कोणतीही सरकारी भरती खासगी कंपन्यांमार्फत करू नका अशा २५ मागण्या केल्या जात असल्याचे रविकांत वरपे यांनी यावेळी सांगितले.