शेतकऱ्यांनो सावधान ! तुम्ही छुप्या मार्गाने येणारे बोगस बियाणे तर घेत नाही ना?

खरेदी न करण्याचे कृषी अधीक्षकांचे आवाहन

गडचिरोली : जिल्ह्यात सध्या बोगस बियाणे खाजगी व्यक्तीमार्फत छुप्या मार्गाने पुरवठा होण्याची शक्यता आहे. या अवैध बियाण्यांना शासनाची कोणतीही मान्यता नाही. त्यामुळे हे बियाणे विक्री करणे, बाळगणे, साठा करणे गुन्हा आहे. शेतकऱ्यांनी खरीप हंगामात लागवडीसाठी एचटीबीटी (चोर बीटी) बियाणे खरेदी करू नये, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बसवराज मास्तोळी यांनी केले आहे.

या प्रकारचे मान्यता नसलेल्या बीटी बियाण्यांची लागवड केल्यास कापूस पिकाची पाने व कापसाचे नमुने तपसणी करण्याचे तंत्रज्ञान अवगत झाले आहे. यात एचटी बीटी आढळून आल्यास संबंधितावर कारवाई करण्यात येणार आहे. सदर एचटीबीटी लागवड केल्याने जामिनीचा ऱ्हास होऊन जमिनी कालांतराने नापीक होतात. मानवी आरोग्यावरही त्यांचा दुष्परिणाम होतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी अधिकृत कापूस बियाणेच लागवड करावे. एखाद्या व्यक्तीकडे अनधिकृत एचटी बीटी बियाणे आढळून आल्यास त्याच्यावर गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात येणार आहे. एचटीबीटी बियाणे विक्री करणाऱ्या लोकांवर कृषी विभाग लक्ष ठेवून असून टीम अॅक्टिव्ह केली आहे. आष्टी परिसर व आजूबाजूच्या परिसरात कृषी विभाग स्वत: लक्ष देऊन आहे. शक्य तिथे पोलिस विभागाचीही मदत घेतली जात आहे, असे जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक संजय मेश्राम यांनी कळविले आहे.