चामोर्शी : आई-वडील मिरच्या तोडण्यासाठी तेलंगणात गेले असताना आपल्या आजीसोबत मार्कंडादेव येथे आलेल्या 12 वर्षीय बालकाचा वैनगंगा नदीत दुर्दैवी मृत्यू झाला. चांद वामन मोंगरकर असे त्या बालकाचे नाव आहे. तो चंद्रपूर जिल्ह्याच्या सावली तालुक्यातील व्याहाड (बु.) येथील रहिवासी होता.
चांद हा आजी मंदाबाई रामदास नैताम यांच्यासोबत मार्कंडा येथे दर्शनाला आला होता. यावेळी मंथन नैताम हे नातेवाईकसुद्धा सोबत होते. मंथन आणि चांद हे दोघे आंघोळीसाठी वैनगंगा नदीत उतरले. पण पाण्याचा अंदाज न आल्याने ते खोल पाण्याकडे गेले. यावेळी चांद गटांगळ्या खात पाण्यात बुडाला. गावकरी आणि नावाड्यांच्या मदतीने शोध घेतला असता काही तासांनी त्याचा मृतदेहच हाती लागला. चामोर्शी पोलीस पुढील तपास करीत आहेत.